नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 05:48 IST2025-05-26T05:48:37+5:302025-05-26T05:48:45+5:30
दक्षिण मुंबईवरून गुजरातकडे जाणारी वाहतूक जलद होणार

नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
मुंबई : मरीन ड्राईव्ह ते पालघर दरम्यान विविध सागरी सेतू प्रकल्पांच्या कामांना गती मिळाली असून, येत्या काही वर्षांत हे प्रकल्प प्रत्यक्षात येणार आहेत. त्यानंतर मरीन ड्राईव्हवरून पालघरला एक ते सव्वा तासात विनाथांबा पोहोचणे शक्य होणार आहे. सागरी सेतूंच्या या श्रृखंलेतील उत्तन-विरार सागरी सेतूच्या प्रस्तावाला लवकरच हिरवा कंदील मिळण्याची चिन्हे आहेत. पुढे विरार ते पालघर असाही सागरी सेतू उभारण्याचे प्रस्तावित आहे. विरार-पालघर सागरी सेतूची सुसाध्यता तपासणीही सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्यातून दक्षिण मुंबईवरूनगुजरातकडे जाणारी वाहतूक जलद होणार आहे.
पालिकेने उभारलेला मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला आहे, तर वांद्रे वरळी सी लिंक वापरात आहे. सद्य:स्थितीत एमएसआरडीसीकडून वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. त्यापुढे वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यात कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून, येत्या काही महिन्यांत प्रत्यक्ष जमिनीवरील कामाला सुरुवात होणार आहे.
परदेशी वित्त संस्थांकडून प्रकल्पासाठी कर्ज घेणार
उत्तन ते विरार हा सागरी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला असून, त्याला प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
मंजुरीनंतर या प्रकल्पासाठी परदेशी वित्त संस्थांकडून कर्ज उभारण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाणार आहे. केंद्राची मंजुरी मिळताच या प्रकल्पाच्या कामासाठीही कंत्राटदार नेमला जाईल. त्यामुळे पुढील वर्षात या सागरी सेतूच्या उभारणीचे कामही सुरू होणार आहे.
उत्तन ते विरार सागरी सेतूमुळे दक्षिण मुंबईतून थेट विरारपर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होईल. त्यातून नरिमन पॉइंट येथून विरार येथे पोहण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ लागेल.
प्रकल्पाचा फायदा
पश्चिम द्रूतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोडसारख्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन कोंडी दूर होईल. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल. रस्ते अपघात कमी होतील आणि ध्वनी व वायूप्रदूषणात लक्षणीय घट होऊन नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.
उत्तन विरार सागरी प्रकल्पाची माहिती
प्रकल्पाची एकूण लांबी - ५५.१२ किमी
सागरी सेतू - २४.३५ किमी
विरार कनेक्टर - १८.९५ किमी
उत्तन कनेक्टर - ९.३२ किमी
वसई कनेक्टर - २.५ किमी
प्रकल्पाची किंमत - ८७,४२७ कोटी