मुंबई : पावसाळ्यात सखल भागात पाणी साचते, तसेच मीटर बॉक्समध्ये पावसाने पाणी गेल्याने मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषत: अमर्यादित काळासाठी वीजपुरवठा खंडित होण्यासह दुर्दैवी घटना घडून मनुष्यहानीही होते. या पार्श्वभूमीवर मान्सूनदरम्यान मुंबईत वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी बेस्ट, टाटा आणि अदानी या वीज कंपन्यांनी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. यासोबतच वीजग्राहकांना काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
बेस्टने यावर उपाय म्हणून तक्रारी सोडविण्यासाठी जागोजागी अतिरिक्त कर्मचारी नेमणूक करण्याचे ठरविले आहे. शिवाय नियंत्रण कक्ष हा २४ तास सुरू असणार असून, कक्षात तक्रार करताना ग्राहकांनी ग्राहक क्रमांक अथवा मीटर क्रमांक नोंदवावा, असे आवाहन बेस्टने केले आहे. शिवाय ग्राहकांना आपली तक्रार मीबेस्ट या ॲपवरही नोंदविता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे विभागनिहाय नियंत्रण कक्षाचे क्रमांकही बेस्टने ग्राहकांना दिले आहेत.
अशी घ्या काळजी... वीजमापक केबिन सिमेंटने बांधून घ्या. केबिन जमिनीपासून उंचावर बांधा. जेणेकरून त्यात पावसाचे पाणी जाणार नाही. परवानाधारक ठेकेदाराकडून वीजमापकाच्या केबिनपासून घरापर्यंतचे वायरिंग, विद्युत उपकरणांचे वायरिंग व विद्युतसंच मांडणी तपासून घ्या. अतिवृष्टीवेळे केबिनमध्ये पाणी गेले तर घरातील विजेचे मुख्य स्वीच बंद करा. विद्युत कंत्राटदाराने सुरक्षेची खात्री दिल्यानंतर वीजपुरवठा सुरू करा. वीज मापकाची केबिन, मार्गप्रकाश दिव्यांचे खांब, वीज वितरण स्तंभातून ठिणगी पडत असेल तर नियंत्रण कक्षाला माहिती द्या. ज्या घरांना तात्पुरता वीजपुरवठा दिला आहे त्यांनी अत्यावश्यक वीज उपकरणांचा वापर करावा.
वीजग्राहकांनी काय करावे?स्वीचबोर्ड किंवा विजेच्या विविध उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करावी. फ्यूज तार म्हणून तांब्याऐवजी ॲल्युमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची तार वापरावी. सर्व उपकरणे स्वीचबोर्डपासून बंद करावीत. विजेचे खांब किंवा तारांजवळ कपडे वाळत घालू नयेत. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.