Join us  

ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं हे समाजासाठी घातक - छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 9:01 AM

ओबीसींचे तीन तुकडे करण्याविरोधात  सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. केंद्र सरकारने न्या.रोहिणी आयोग नेमून आरक्षणाचा ओबीसींतील काही घटकांना लाभ होतो असे कारण देत ओबीसींचे तीन भाग करण्याचे काम सुरू केले आहे.

मुंबई - केंद्र शासनाकडून ओबीसी आरक्षणाबाबत न्या. रोहिणी आयोग नेमून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात ओबीसींची जनगणना झाली नसताना कोणत्या आकडेवारीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे ठरविले आहे असा सवाल उपस्थित करत ओबीसींचे तीन तुकडे हे ओबीसींसाठी अत्यंत घातक असल्याचा आरोप ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी करत पुढील काळात ओबीसी आरक्षणाप्रमाणे इतर आरक्षणाबाबतही असे निर्णय होण्याचे चित्र आहे असं सांगितले. मुंबई येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची आढावा बैठक मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या सभागृहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींचे तीन तुकडे करण्याविरोधात  सर्वांनी एकत्र येत लढा उभारण्याची गरज आहे. केंद्र सरकारने न्या.रोहिणी आयोग नेमून आरक्षणाचा ओबीसींतील काही घटकांना लाभ होतो असे कारण देत ओबीसींचे तीन भाग करण्याचे काम सुरू केले आहे. ओबीसी आरक्षणात २ हजार ६२३ जाती आहेत. त्यातील ९८३ जातींना लाभ मिळत नसल्याचा निष्कर्ष काढला. त्यामुळे ज्यांना लाभ मिळत नाही त्यांना १० टक्के, अंशतः लाभ मिळणाऱ्यांना १० टक्के व सर्वाधिक लाभ मिळणाऱ्यांना ७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जात असून ओबीसीतील केवळ १० जातींना २५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळत असल्याचे निष्कर्ष काढला जात आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशात ओबीसींची जनगणना झाली नसतांना कोणत्या आकडेवारीच्या आधारे आरक्षणाचा लाभ मिळत नाही हे ठरविले आहे असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. जो प्रकार ओबीसी आरक्षणाबाबत होत आहे ते इतर आरक्षणाबाबत होईल असे चित्र आहे. एकंदरीत देशातील आरक्षण डावलण्याचा प्रयत्न सुरू असून याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे छगन भुजबळ म्हणाले की, समता परिषदेसाठी तन मन धनाने गेल्या २७ वर्षापासून सुरू आहे. मुंबईतुन सुरू झालेली ही चळवळ दिल्लीसह देशभरात पोहोचविली. समाजातील वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना केली होती. त्या दृष्टीने आरक्षण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासह अनेक कामे या माध्यमातून झाली. ओबीसी समाजासाठी काम करत असतांना विरोधकांनी आम्ही इतर समाजाला विरोध करणारे आहोत असा प्रचार केला जात आहे ही दुर्दैवी बाब असल्याचे सांगून सर्व समाजामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या समतेची ज्योत तेवत ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :ओबीसी आरक्षणछगन भुजबळकेंद्र सरकार