Join us  

एआयएफएफमधून तीन चित्रपटांना वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 3:20 AM

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (एमआयएफएफ) त सहभागी होऊ पाहणाऱ्या तीन चित्रपटांना वगळताना एमआयएफएफची प्रक्रिया काय असते, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (एमआयएफएफ) त सहभागी होऊ पाहणाऱ्या तीन चित्रपटांना वगळताना एमआयएफएफची प्रक्रिया काय असते, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. चित्रपट निर्माते आनंद पटवर्धन व पंकज कुमार यांचे एकुण तीन चित्रपट मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यास नकार देण्यात आल्यानंतर या दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. आर. आय. छागला यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकाकर्त्यांचे चित्रपट एमआयएफएफदरम्यान न दाखविण्याचा निर्णय का घेण्यात आला, याचे कारण चित्रपट महोत्सव आयोजकांनी दिले नाही. चित्रपट निर्मात्यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य या चित्रपटांतून केले असल्याने सरकारने या चित्रपटांना महोत्सवादरम्यान न दाखविण्याचा निर्णय घेतला असावा, अशी भीती निर्मात्यांना आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी न्यायालयात केला.मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पाच दिवस रंगणार आहे. या महोत्सवाला २८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. न्यायालयाने अ‍ॅडिशनल सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांना २७ जानेवारी रोजी या महोत्सवसासंबंधीचे सर्व कागदपत्रे व निवड समिती महोत्सवातून चित्रपट वगळताना कोणती प्रक्रिया पार पाडते, याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.‘चित्रपटातील काही भागांमुळे चित्रपट दाखवला जाणार नाही, अशी भीती याचिकाकर्त्यांना आहे. चित्रपट वगळताना कोणती प्रक्रिया समितीने पार पाडली, याची माहिती द्या,’ असे न्या. धर्माधिकारी यांनी म्हटले.महोत्सवातून चित्रपट वगळताना निवड समितीने मनमानी कारभार केला आहे , असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. आनंद पटवर्धन निर्मित ‘विवेक/रिझन’ या माहितीपटातून एका राजकीय विचारसणीच्या वाढत्या प्रभावाविषयी भाष्य करण्यात आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, साहित्यिक एम.एम. कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या आणि या हत्यांचा एका संप्रदायाच्या संस्थेशी असलेला संबंध, याबाबत या चित्रपटातून माहिती देण्यात आली आहे. तसेच गोमाता रक्षणार्थ मुस्लीम व दलितांवर झालेले हल्ले, जातीवरून भेदभाव करण्यात आल्याने रोहित वेमुला या तरुण नेत्याने केलेली आत्महत्या आणि सध्या आपला देश ज्या अनेक छोेट्या-मोठ्या हिंसाचाराचा साक्षीदार आहे, त्याचा आढावा या माहितीपटातून घेण्यात आला आहे. तर पंकज कुमार यांचा ‘जनानीज् ज्युलिएट’ या चित्रपटाने इंडियनोस्ट्रम थिएटर (पाँडिचेरीचा थिएटर ग्रुप) ची कहाणी मांडली आहे. हा ग्रुप देशातील आॅनर किलिंगच्या घटनेने अस्वस्थ आहे. जात, वर्ग आणि लिंग यामुळे होणाºया परिणाम, या चित्रपटाद्वारे मांडण्यात आला आहे. तर त्यांचा दुसरा चित्रपट ‘टू फ्लॅग्स’ या चित्रपटातून पाँडिचेरी येथील राजकीय स्थिती आणि सामान्यांचे जीवन यावर आधारित आहे. 

टॅग्स :सिनेमामुंबईमुंबई हायकोर्ट