कचऱ्याच्या दुर्गंधीवर उपाय शोधायला लखनौला गेलेले परतले रिकाम्या हाती, फारसे नवीन काही दिसलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:22 IST2026-02-20T15:21:11+5:302026-02-20T15:22:14+5:30
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याच्या दुर्गंधीवर उतारा शोधण्यासाठी लखनौला गेलेल्या मुंबईतील तज्ज्ञांच्या समितीच्या हाती फारसे काही लागलेले नाही.

कचऱ्याच्या दुर्गंधीवर उपाय शोधायला लखनौला गेलेले परतले रिकाम्या हाती, फारसे नवीन काही दिसलेच नाही
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याच्या दुर्गंधीवर उतारा शोधण्यासाठी लखनौला गेलेल्या मुंबईतील तज्ज्ञांच्या समितीच्या हाती फारसे काही लागलेले नाही. लखनौमधील डम्पिंगवर कचऱ्याची दुर्गंधी रोखण्यासाठी फारसे नवीन तंत्रज्ञान उपयोगात आणलेले नसल्याचे या समितीला आढळून आले आहे. त्यामुळे या समितीचा हा दौरा वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
लखनौमध्ये जे तंत्रज्ञान वापरले जात आहे, त्यावरच आधारित प्रक्रिया कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर पूर्वीपासून सुरू आहे. त्यामुळे या समितीला लखनौला पाठविण्याचे प्रयोजनच काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडचे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. तेथे झालेल्या सुनावणीनंतर याप्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेण्यात आली. या समितीने मध्यंतरी डम्पिंग ग्राऊंडवर जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर काही दिवस उलटून गेल्यानंतर कचऱ्याची दुर्गंधी रोखण्यासाठी लखनौ शहरात वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते, ते नेमके कोणते याचा अभ्यास करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार तज्ज्ञांचे एक पथक लखनौला पाठविण्यात आले. यावेळी तेथे कोणतेही नवीन तंत्रज्ञान नसल्याचे समितीला आढळून आले, अशी माहिती समितीच्या एका सदस्याने खासगीत बोलताना दिली.
प्रकल्पाच्या नावीन्याबाबत कल्पना नव्हती का?
एकप्रकारे समिती सदस्यांचा लखनौ दौरा वाया गेला आहे. तेथे कोणते वेगळे तंत्रज्ञान वापरले जाते का, मुंबईच्या तुलनेत तेथे काय नावीन्य आहे. याची पूर्वकल्पना तरी होती का, जर नावीन्य नव्हते तर दौरा कशासाठी काढला गेला, असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
वेगळे काहीच नव्हते
दुर्गंधी दूर करण्यासाठी कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर अशा प्रकारचे तंत्रज्ञान आणि इतर उपाययोजना आपण यापूर्वीपासून करत आहोत, त्यामुळे तेथे काहीतरी वेगळे असे काहीच आम्हाला आढळले नाही, असेही तज्ज्ञ समितीमधील या सदस्याने सांगितले.