गृहखरेदीत फसवणूक झालेल्यांना मिळणार 24 कोटींचा परतावा; मुंबई ग्राहक पंचायतीच्या लढ्याला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2020 01:01 AM2020-12-27T01:01:01+5:302020-12-27T07:15:05+5:30

ग्राहकांना दिलासा

Those who have been cheated in home purchase will get a refund of Rs 24 crore | गृहखरेदीत फसवणूक झालेल्यांना मिळणार 24 कोटींचा परतावा; मुंबई ग्राहक पंचायतीच्या लढ्याला यश

गृहखरेदीत फसवणूक झालेल्यांना मिळणार 24 कोटींचा परतावा; मुंबई ग्राहक पंचायतीच्या लढ्याला यश

Next

मुंबई : विलेपार्ले येथील विकासक जयंत परांजपे यांनी १९८६ ते १९९७ दरम्यान विरार-कोफराड येथे माफक दरात घरे उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून शेकडो मध्यमवर्गीय ग्राहकांची फसवणूूूक केली. या विराेधात मुंबई ग्राहक पंचायतीने न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश आले असून, ग्राहकांना २४ कोटींचा परतावा मिळणार आहे. मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲड.शिरीष देशपांडे यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

आठशे हतबल ग्राहकांनी १९९७/९८ मध्ये मुंबई ग्राहक पंचायतीकडे न्यायासाठी धाव घेतली होती. या सर्व ग्राहकांना त्यांच्या रकमा परत मिळवून, देण्याच्या मार्गातील अनेक अडचणींवर मुंबई ग्राहक पंचायतीने अखेर यशस्वी मात केली. त्यांना व्याजासह धनादेश वितरित करण्याचे काम २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनापासून सुरू झाले आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.

ग्राहक न्यायालयात जाऊन जयंत परांजपे यांच्या विरार येथील मालमत्तेवर जप्ती आणून, त्या मालमत्तेचा लिलाव‌ करण्याचे आदेश मुंबई ग्राहक पंचायतीने मिळविले. लिलावाची अंतिम तारीख निश्चित होताच, त्यावर स्थगिती आणण्यासाठी जयंत परांजपे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याला मुंबई ग्राहक पंचायतीने आक्षेप घेत‌ विरोध केला. त्यामुळे उच्च न्यायालयाने परांजपे यांचा स्थगिती अर्ज फेटाळला.

मात्र, लिलावाद्वारे प्राप्त होणारी रक्कम न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत ग्राहकांना वितरीत न करता, सरकारकडे जमा करावी, असा आदेश दिला. त्यानंतर, सहा वर्षे ही याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित होती. त्यावर पुन्हा एकदा ग्राहक पंचायतीने आग्रह धरून ही याचिका लवकरात लवकर निकालात काढावी, म्हणून पाठपुरावा केला. अखेर उच्च न्यायालयाने परांजपे यांची लिलावाला आव्हान देणारी याचिका २०१८ मध्ये फेटाळून लावली. काेरोनामुळे मार्चमध्ये अचानक टाळेबंदी जाहीर झाली आणि पुन्हा एकदा सर्व काही ठप्प झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

मार्गदर्शनासाठी विशेष कक्षाची स्थापना
ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि कागदपत्रे पडताळणीसाठी विलेपार्ले ग्राहक भवन येथे विशेष कक्ष दुपारी २ ते संध्याकाळी ५ या वेळेत कार्यरत असेल. ८८२८३ १११०९ या भ्रमणध्वनीवर १० ते ५ या वेळेत ग्राहकांनी संपर्क साधावा, असे आवाहन‌ मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह अनिता खानोलकर यांनी संबंधित ग्राहकांना केले आहे.

Web Title: Those who have been cheated in home purchase will get a refund of Rs 24 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई