मुंबई - दुधाच्या टँकरमधील १६० लिटर म्हशीच्या दुधाची चोरी करून पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी जंगबहादूर राजभर (४२) आणि सुरेंद्र राजभर (४६) या टँकर चालकासह, क्लीनर आकाश यादव (२२) व राजेश यादव (४८) तसेच त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तेजप्रताप सिंह (४०, रा. मालाड पश्चिम) यांचा होलसेल दूध विक्रीचा धंदा आहे. त्यांच्या डेअरीमध्ये मध्य प्रदेश मधून होलसेल किमतीत म्हशीचे दूध येते. ते आधी वसईत पुरवले जाते. त्यानंतर सिंह यांच्या मालकीच्या दोन टँकरमधून ते शहरातील ठिकठिकाणच्या दूध डेअरीवर पाठवतात. या दोन्ही टँकरवर आरोपी काम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशमधील प्रकल्पातून पाठवलेल्या दुधापेक्षा कमी दूध वसईतून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी दोन्ही टँकरचे जीपीएस लोकेशन तपासले जे मालाड पूर्वेकडील दत्त मंदिर येथे दाखवले जात होते. मात्र, तेथे त्यांच्या डेअरीची कोणतीही शाखा नव्हती. त्यामुळे संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाची पडताळणी सुरू केली.
... असा लागला छडा ४ आणि ५ जून रोजी वसईतून दूध घेऊन निघाल्यानंतर जंगबहादूर आणि आकाश यांनी भारत दुग्धालय येथे १६० लिटर दूध पुरवत त्यात तितक्याच मापाचे पाणी मिसळल्याचे तक्रारदार तेजप्रताप सिंह यांना समजले.
त्यानुसार सिंह यांनी पडताळणी केली. त्यावेळी ते जंगहादूर आणि आकाश यांना काही बोलले नाहीत. मात्र, ६ जून रोजी सुरेंद्र आणि राजेश यांनीही वसईतून टँकरने आणलेले दूध भारत दुग्धालय येथे चोरीने पुरवले असता त्यांना सिंह यांनी रंगेहात पकडत चोरीचा जाब विचारला.
त्यावर दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर सिंह त्यांना थेट दिंडोशी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथे त्यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.