Join us

मुंबईत नालेसफाई नाही, ही तर निव्वळ 'हाथ की सफाई'; वर्षा गायकवाड यांचा आरोप

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 19, 2023 16:46 IST

आज त्यांनी धारावी येथील ६० फीट रोड, प्रेम नगर आणि शेठ नगर या परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.

मुंबई- मान्सूनपूर्व १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा सत्ताधारी शिंदे व फडणवीस सरकार आणि मुंबई महानगरपालिका करत असली तरी मात्र वास्तव परिस्थिती भयावह आहे. प्रत्यक्षात मुंबईतील अनेक भागांत नालेसफाईची कामं झालीच नाहीत आणि त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्षा,आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

आज त्यांनी धारावी येथील ६० फीट रोड, प्रेम नगर आणि शेठ नगर या परिसरातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. त्यात अनेक ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजून त्याच ठिकाणी पडून असल्याचं आढळलं. काही भागात तर नालेसफाई झालीच नसल्याचं दिसून आलं. अशीच भयानक परिस्थिती मुंबईच्या अनेक भागांत पहायला मिळत आहे. यासंदर्भातील अनेक तक्रारी जागरूक नागरिकांनी आमच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेनं रुपये २२६ कोटी खर्च करून मुंबईत पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई केल्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात ही नालेसफाई नव्हे तर, सत्ताधारी, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये भ्रष्टाचार होऊन निव्वळ 'हाथ की सफाई' झालेली आहे, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. या नालेसफाई घोटाळ्याची चौकशी त्वरित करून सर्व दोषींवर कडक कारवाई व्हावी तसेच ज्या भागाच्या नालेसफाईची कामं अजूनही झालेली नाहीत, ती ताबडतोब करावीत, अशी मुंबई काँग्रेस तर्फे आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :वर्षा गायकवाडमुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र सरकार