विकासाचे वारे उधळले... नभ टॉवरनी आक्रमिले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:19 IST2025-06-09T12:17:10+5:302025-06-09T12:19:08+5:30
पूर्वी सकाळची कोवळी उन्हे घरात पसरायची... आकाशाचा एक तुकडा खिडकीतून दिसायचा. मग संध्याकाळी संधीप्रकाश आसमंताला व्यापू लागला किंवा रात्रीचा प्रखर उजेड डोळ्यांना खुपू लागला की, तांबुसलेल्या अवकाशात घरट्यांकडे परतणाऱ्या पाखरांचे थवे दिसायचे. वैशाख सरतासरता आकाशातली काळ्या-पांढऱ्या ढगांची दाटी पावसाळ्याचा पायरव द्यायची.

विकासाचे वारे उधळले... नभ टॉवरनी आक्रमिले!
- सिद्धार्थ ताराबाई
(मुख्य उपसंपादक)
पूर्वी सकाळची कोवळी उन्हे घरात पसरायची... आकाशाचा एक तुकडा खिडकीतून दिसायचा. मग संध्याकाळी संधीप्रकाश आसमंताला व्यापू लागला किंवा रात्रीचा प्रखर उजेड डोळ्यांना खुपू लागला की, तांबुसलेल्या अवकाशात घरट्यांकडे परतणाऱ्या पाखरांचे थवे दिसायचे. वैशाख सरतासरता आकाशातली काळ्या-पांढऱ्या ढगांची दाटी पावसाळ्याचा पायरव द्यायची. मग, पावसाळ्यात क्षितिजावरून सरसरत येणाऱ्या तिरकस सरी समोरच्या खाडीत उतरायच्या. घरबसल्या चिंब करायच्या. आता, तो आकाशाचा तुकडा, तो आसपासचा अवकाश ‘विकासा’ने गिळून टाकला आहे. खाडीच्या छाताडावर उभारलेले टॉवर्स आकाश भेदून उभे आहेत. हाच असावा अण्णा भाऊ साठेंनी वर्णिलेल्या मुंबईचा चारी लोकी डंका...
चौखूर उधळलेल्या ‘विकासा’ने आधी या महानगराच्या पायाखालच्या जमिनीचा फडशा पाडला. नंतर मुंबईचा अवकाशही फस्त केला आणि आता तिच्या डोक्यावरच्या आकाशावरही निकराचे अतिक्रमण सुरू केलं आहे. हे कसं घडलं? जमीन संपल्याने त्या-त्या वेळचे राज्यकर्ते आणि बिल्डर यांच्या मनोमीलनातून विकासाच्या पोटी आकाश गिळणारं ‘पुनर्विकास’ हे गोंडस बाळ जन्माला घातलं गेलं. त्यातून पुढे अख्क्या मुंबईला ‘विकासा’चे ग्रहण ग्रासू लागलं.
विकासाच्या या रणधुमाळीत बांधकामाच्या धंद्यातून नफेखोरी करून मुंबईकरांचं राहणं महाग करणाऱ्या बिल्डरांचं बिनबोभाट ‘विकासक’ असं लोभस नामकरण करण्यात आलं. हे विकासक आणि राजकारणी आता मुंबईचं प्राक्तन लिहित आहेत...आणि भविष्यातला इतिहासही घडवत आहेत. त्यात कदाचित दररोज हजारो-लाखोंच्या संख्येने मुंबईत उतरणाऱ्या अखिल भारतीय परप्रांतीयांना सामावून घेण्याची क्षमता असेल.
येणाऱ्या प्रत्येकाला सामावून घेण्याची क्षमता मुंबापुरीत निर्माण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असतानाच कुणीतरी शंकासुराने प्रश्न उपस्थित केला आहे. प्राप्त परिस्थितीत विकास विरोधकच प्रश्न उपस्थित करू शकतात. पण, प्रश्न न्यायालयात उपस्थित झाल्यानं तसं थेट म्हणता येत नाही. विशेष म्हणजे न्यायालयानंही राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला या प्रश्नाचं उत्तर द्यायला करायला सांगितलं आहे. प्रश्न लाख नव्हे, तर कोटीमोलाचा आहे... मुंबईची वहन क्षमता (कॅरिइंग कपॅसिटी) किती?
हाच प्रश्न एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता देवतेला विचारला, तर तीही गोंधळली. म्हणाली, मुंबईच्या वहन क्षमतेबाबत वाद आहे. एका अंदाजानुसार १.३३ एफएसआय गृहित धरला, तर ११.१० दशलक्ष (१ कोटी ११ लाख लोकसंख्या) एवढी वहन क्षमता आहे. दुसऱ्या एका अंदाजानुसार १ एफएसआय वापरला, तर बृहन्मुंबईसाठी ती क्षमता ८.२७ दशलक्ष (८२ लाख ७० हजार) आहे. म्हणजे, एफएसआय आणि वहन क्षमता यांचं मेतकुट असतं तर. विशेष म्हणजे हे एफएसआय वाढवणं सुरूच असतं.
उपलब्ध मूलभूत आणि पायाभूत सोयी-सुविधा, साधनं यावर एखाद्या शहराची वहन क्षमता म्हणजे लोकसंख्या सामावून घेण्याची, तिचे पालन-पोषण करण्याची, तिच्या गरजा भागवण्याची कुवत ठरवली जाते. बिल्डरांना एफएसआय वाढवून का दिला जातो? बहुधा त्याचं हे उत्तर. मुंबईची फुफ्फुसं, आकाश नि अवकाश, समुद्र, त्याचे किनारे आणि अगदी भूगर्भात शिरून माणसं सामावून घेण्याची मुंबईची क्षमता वाढवण्याचे राष्ट्रकार्य मुंबईत अव्याहतपणे सुरूच राहणार आहे.
आपण फक्त कुतूहलानं किंवा कौतुकानं लांबपल्ल्याच्या गाड्यांतून उतरून मुंबईच्या उदरात गडप होणारी बिनचेहऱ्याची आशाळभूत, अनोळखी गर्दी पाहत बसायचं. जमलंच तर एवढी माणसं दररोज मुंबईत शिरतात, पण ती जातात कुठं? असा प्रश्न मनातल्यामनात घोळवत, आपण मुंबईची वहन क्षमता किती? या प्रश्नाचं काय उत्तर महापालिका देते, याची उत्सकतेनं वाट पाहायची...