नायगाव ‘बीडीडी’वासीयांची नव्या घराची प्रतीक्षा अखेर संपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:56 IST2026-03-12T12:56:12+5:302026-03-12T12:56:41+5:30
दादर येथील नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

नायगाव ‘बीडीडी’वासीयांची नव्या घराची प्रतीक्षा अखेर संपली
मुंबई : दादर येथील नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. चार महिन्यांपासून नव्या घरात जाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ८६४ कुटुंबांच्या घराचे स्वप्नअखेर पूर्ण झाले आहे. १६ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या घराच्या चाव्या देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०२५मध्ये पूर्ण झाला असून, दिवाळीत त्यांना घराचा ताबा मिळेल, अशी योजना होती.
मुख्यमंत्र्यांना साकडे
दिवाळीत काही कारणास्तव चावी वाटपाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यानंतर महापालिका निवडणुकीमुळे गृहप्रवेश बारगळला.
गेल्या रविवारी आ. कालिदास कोळंबकर तसेच काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या पत्नी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चावी वाटपाबाबत पत्र दिले. आता हा रखडलेला चावी वाटपाचा कार्यक्रम सोमवारी होणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळ अद्याप निश्चित होणे बाकी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मे २०२६पासून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात
पहिल्या टप्प्यातील कुटुंबांना नव्या घराचा ताबा दिल्यानंतर संक्रमण शिबिरातील गाळे रिकामे होतील. त्या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यातील कुटुंबांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या कामाला गती येईल. येत्या एक-दीड महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करून मे २०२६पासून दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे समजते.
गृहकर्जाचा हप्ता आणि पगारातून वजा होणारे घरभाडे यामुळे खूप आर्थिक चणचण होत आहे. गेले चार महिने आम्ही घराच्या प्रतीक्षेत होतो. आता तरी चावी लवकरात लवकर मिळावी, म्हणजे गुढी तिथेच उभारून पाडवा
साजरा करू.
तन्वी तुळसकर, रहिवासी