ताडदेवमधील वेलिंग्टन हाइट्स इमारतीतील रहिवाशांसाठी धावून आले मुख्यमंत्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:42 IST2025-08-28T21:41:54+5:302025-08-28T21:42:19+5:30
इमारतीतील रहिवाशांना मिळाला दिलासा

ताडदेवमधील वेलिंग्टन हाइट्स इमारतीतील रहिवाशांसाठी धावून आले मुख्यमंत्री!
मुंबई : ताडदेव येथील वेलिंग्टन हाइट्स इमारतीसंदर्भात कोर्टाने घरे खाली करण्याचे आदेश दिल्यानंतर रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे रहिवाशांना अखेर न्याय मिळाला आहे.
माजी खासदार गोपाळ यांनी दि,२५ ऑगस्ट रोजी येथील नागरिकांसह भायखळा येथील मुख्य अग्निशमन दलाच्या कार्यालयाला आंदोलन करून घेराव घातला होता.जर येथील नागरिकांना न्याय मिळाला नाही तर निषेध म्हणून आंदोलन करत मुंडन करण्याचा इशारा देखिल त्यांनी दिला होता.
या प्रकरणात रहिवाशांची काहीही चूक नसून बिल्डरकडून गंभीर फसवणूक करण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ऑक्युपन्सी सर्टिफिकेट व संबंधित फाईल रखडलेल्या होत्या.
ताडदेव,तुलसी वाडी येथील ३४ मजली वेलिंग्टन सोसायटीच्या इमारतीच्या १७ ते ३४ मजल्यांना ओसी नसल्याने न्यायालयाने त्यांनी तीन आठवड्यात उद्या दि,२७ पर्यंत इमारत खाली करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे येथील रहिवाशांवर टांगती तलवार होती अशी माहिती शेट्टी यांनी दिली.
उपनगराचे सह पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखिल येथील रहिवाश्यांना पाठिंबा देत बाजू पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली.
रहिवाशांवर अन्याय होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीने कारवाई करत जर सर्व बाबींचे अनुपालन व्यवस्थित झाले असेल तर ओसी देण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. या निर्णयामुळे वेलिंग्टन हाइट्समधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.जिथे कुठे जनतेवर अन्याय होईल, तिथे जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या सोबत असतील असे त्यांनी सांगितले.