भटक्या कुत्र्यांवर ‘निवाऱ्या’ची मात्रा; केंद्रासाठी मालवणीत ५ एकर जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 09:45 IST2026-03-11T09:44:48+5:302026-03-11T09:45:13+5:30
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

भटक्या कुत्र्यांवर ‘निवाऱ्या’ची मात्रा; केंद्रासाठी मालवणीत ५ एकर जागा
मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांनी यावर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सर्वांत श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यासाठी मालवणी परिसरात नवीन प्राणी निवारा केंद्र उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या केंद्रासाठी राज्य सरकारकडून सुमारे पाच एकर जागा उपलब्ध होण्याची शक्यता असून, त्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
सध्या महापालिकेकडे शहरात आठ निवारा केंद्रे कार्यरत आहेत; मात्र वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येच्या तुलनेत ती अपुरी ठरत आहे. त्यामुळे मालवणी येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या केंद्रात एक हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांना ठेवण्याची सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती महपालिका अधिकाऱ्यांनी दिली.
पशुवैद्यकीय सेवांचा विस्तार
महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, त्यात नवीन निवारा केंद्रे उभारणे, विद्यमान केंद्रांची क्षमता वाढवणे आणि पशुवैद्यकीय सेवांचा विस्तार करणे यांचा समावेश आहे. मालवणी येथे जागा मिळाल्यानंतर पश्चिम उपनगरातील प्राणी निवारा केंद्रांची संख्या वाढून भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
काय सांगातात आकडे?
मुंबईत ९०,७५७ भटके श्वान
एका चौरस किमीमध्ये २२४ श्वान
झोपडपट्टीभागात प्रतिकिमी ८ श्वान
महापालिकेचे नियोजन काय?
महापालिकेच्या नियोजनानुसार शहरात पकडलेल्या भटक्या कुत्र्यांचे प्रथम निर्बिजीकरण व लसीकरण करून नंतर त्यांना संबंधित परिसरात सोडण्याची पद्धत आहे. मात्र, गंभीर जखमी, आजारी किंवा आक्रमक कुत्र्यांना तात्पुरता निवारा देण्यासाठी अतिरिक्त जागेची गरज भासत होती. यासाठी महापालिकेकडून जागेचा शोध सुरू होता. यासाठी मालवणीतील पाच एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. या प्रस्तावित केंद्रामुळे भटक्या कुत्र्यांच्या निवारा केंद्राची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.