Join us  

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलंय, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे... 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 6:59 PM

राज ठाकरे हेसुद्धा ठाकरे ब्रँडचेच एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा सवाल करत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं?

मुंबई - महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ठाकरे हा ब्रँड आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडले होते. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे, असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सामनातून भूमिका मांडली होती. यावरुन भाजपा नेत्यांनी संजय राऊत व शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यांसदर्भात विचारले असता, हे काय नवीन? असं म्हणत टोला लगावला. 

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? असा सवाल करत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलं? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही, असंही पाटील यांनी सांगितलं. तसेच, यावरुन मनसेच्या एका नेत्यानं शिवसेनेला उत्तर दिलंय, याची आठवणही पाटील यांनी करुन दिली.  

राज ठाकरे हेसुद्धा ठाकरे ब्रँडचेच एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे ग्रहण उपरे लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणेच आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईला पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्या एका नटीच्या बेकायदेशीर बांघकामावर उल्लेख करताच महानगरपालिकेचा उल्लेख बाबर असा करण्यात आला. मुंबईला पाकिस्तान आणि महानगरपालिकेला बाबर म्हणणाऱ्या मागे भाजपा उभा राहतो हे दुर्दैवच म्हटले पाहिजे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली होती. त्यावर, भाजपा आणि मनसेनेही राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. 

राणे बंधुंचाही राऊतांवर प्रहार

ब्रँड प्रकरणावरुन राणे बंधुंनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबई असो की, महाराष्ट्र एकच ब्रँड, छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणेंनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फटकारलं आहे. तर माजी खासदार निलेश राणेंनीही शिवसेनेवर टीका केली आहे. आमदार नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड..छत्रपती शिवाजी महाराज असं एका वाक्यात त्यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं आहे.

मनसेचीही शिवसेनेला चपराक

ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होते. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली आहे. तसेच, महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, तेव्हा कृष्णाने जे कर्णाला म्हटलं होतं, त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...तेच आज आम्ही सांगतो. बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र, शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही मनसेचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आरक्षणावरुन पवारांना लक्ष्य

तामिळनाडूच्या 40 वर्षांपूर्वीच्या आरक्षणाला अद्याप स्टे नाही. पण, मराठा आरक्षणाला स्टे कशामुळे?, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. आपण शेवटच्या बॉलवर मॅच हरलो, याचिकाकर्त्याने स्टे मागिल्यानंतर, स्टे का नको... हे सांगण्यात सरकार कमी पडलं. त्यामुळे ही स्थगिती देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच, अध्यादेशाच्या मुद्द्यावरुन बोलताना पाटील यांनी खासदार शरद पवार यांना लक्ष्य केले. शरद पवारांनी आजपर्यंत मराठा आरक्षण का दिलं नाही. राज्यात सलग 15 वर्षे तुमचं सरकार असतानाही मराठा आरक्षण का दिलं नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अध्यादेश काढणं म्हणजे पहिला आरक्षणाचा कायदा रद्द होणार. त्यामुळे, नवीन अध्यादेश काढणं म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसणं आहे, असेही पाटील यांनी म्हटले. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलमुंबईछत्रपती शिवाजी महाराजराज ठाकरेसंजय राऊत