मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तीन महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:16 IST2026-03-01T05:15:45+5:302026-03-01T05:16:16+5:30
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तीन महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य
मुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्यात आली आहे. माणगाव व इंदापूर बायपासचा अपवाद वगळता उर्वरित कामे मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली.
आमदार निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. समृद्धी महामार्ग झाला पण मुंबई-गोवा महामार्ग रखडला. यामुळे होळी, गणेशोत्सव काळात कोकणवासीयांना प्रंचड यातना सहन कराव्या लागतात. याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. तर, कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे प्रकल्प रखडल्याचा मुद्दा मांडत काम पूर्ण होण्याबाबत वेळापत्रक देण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.
माणगाव व इंदापूर बाह्यवळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल व दोन मोठ्या पुलांची कामे जुलै २०२५ पासून सुरू आहेत. जुना ठेकेदार अपयशी ठरल्याने नवीन एजन्सी नेमली. जुलै २०२७ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तर, चिपळूण येथील पुलाचे काम पूर्ण होऊन मे २०२६ पर्यंत खुला होईल. हातखंबा उड्डाणपूल एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ताम्हिणी घाटाचा बाह्य वळण मार्ग मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.