तलाठी भरती पेपरफुटी म्हणजे देशद्रोह, ताबडतोब परीक्षा रद्द करा, 'आप'ची मागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 19:39 IST2024-01-09T19:39:29+5:302024-01-09T19:39:49+5:30
शासनाच्या सदोष नोकर भरतीबाबत आम आदमी पार्टी व स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एकत्रित मुंबई उच्च न्यायालयात विशेष जनहित याचिका दाखव केली आहे.

तलाठी भरती पेपरफुटी म्हणजे देशद्रोह, ताबडतोब परीक्षा रद्द करा, 'आप'ची मागण
श्रीकांत जाधव
मुंबई: राज्यात जवळपास ६० लाख विद्यार्थी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहून अभ्यास करतात. मुलांच्या स्वप्नांसाठी आई-वडील घरदार गहाण ठेवतात. मात्र, भरती प्रक्रियेतील पेपरफुटीमुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबियांची स्वप्न उध्वस्त होत आहेत. नैराश्याने विद्यार्थी जीवाचे वाईट करू लागली आहेत. तलाठी भरती पेपरफुटी म्हणजे देशद्रोहच आहे. ही परीक्षा ताबडतोब रद्द करा आणि पुढील ४५ दिवसांच्या आत एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घ्या, अशी मागणी आम आदमी पार्टीकडून केली जात आहे.
शासनाच्या सदोष नोकर भरतीबाबत आम आदमी पार्टी व स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एकत्रित मुंबई उच्च न्यायालयात विशेष जनहित याचिका दाखव केली आहे. यासंदर्भात आपचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. नुकताच तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाला आहे. ४ हजार ६४४ तलाठी पदांसाठी झालेली भरती प्रक्रिया सदोष आहे. आपच्या स्पर्धा परीक्षा समनव्य समितीने पाठपुरावा करून सदोष भरतीचे पुरावे जमा केले आहेत.
नाशिक, नगर, वर्धा, अमरावती व सांगली येथील गुन्ह्यांचे एफआरआय आपकडे आहेत. शिवाय एक चार्ज शीट सुद्धा आहे. पुरावे म्हणून आम्ही ते गृहमंत्र्यांना देणार आहोत. अशा प्रकारे गुन्हे करणे म्हणे पेपर फोडणे म्हणजे देशद्रोह आहे. म्हणून आम आदमी पार्टी न्यायालयात धाव घेतली आहे. तलाठी परीक्षा ताबडतोब रद्दकरावी आणि पुढील ४५ दिवसांच्या आत एमपीएससीच्या माध्यमातून परीक्षा घ्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
डमी गणेश गुसिंगे तलाठी परीक्षेत
पोलीस भरती, म्हाडा भरतीत डमी उमेदवार म्हणून वारंवार पकडला गेलेला गणेश मुसुंगे तलाठी परीक्षेत सुद्धा बसला आणि पास झाला. यावरून शासनाचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते.