शेजाऱ्यांकडून कनेक्शन घेताय? वीजचोरीचा गुन्हा दाखल होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:57 IST2026-03-15T13:55:51+5:302026-03-15T13:57:07+5:30
पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर लक्ष ठेवण्यासाठी महावितरणने राबविली विशेष माेहीम

शेजाऱ्यांकडून कनेक्शन घेताय? वीजचोरीचा गुन्हा दाखल होईल!
मुंबई : महावितरणकडून थकबाकीदरांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू आहे. बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्यानंतर काही जण शेजाऱ्यांकडून वीज जोडून घेतात, अशांवर महावितरण वीजचोरीचा गुन्हा दाखल करू शकते. इतकेच नाही, तर एखाद्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित ग्राहकाचे दुसरे कनेक्शन असल्यास त्यावर थकबाकी वळवली जाऊ शकते. त्यामुळे विजेचे बिल भरा, असे आवाहन महावितरणने केले आहे. शेजाऱ्यांकडून वीज कनेक्शन घेणे हा गुन्हा आहे. परंतु, जो ग्राहक शेजाऱ्याला वीज कनेक्शन देतो त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात येतो.
२,५८,५४९ घरगुती ग्राहकांची थकबाकी ३७.३३ कोटी आहे. ३८,८३१ व्यावसायिक ग्राहकांची थकबाकी २२.४७ कोटी आहे तर २,९५१ औद्योगिक ग्राहकांची थकबाकी ५.५४ कोटी आहे. मार्च २०२६ मध्ये आतापर्यंत २७,८१७ लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा वीजबिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे.
वीज ही अत्यावश्यक सेवा असून प्रत्येक ग्राहकाला अखंडित व दर्जेदार पुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न असतो. परंतु, वीजचोरी करणे हे एक गुन्हा असून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
संजय पाटील, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडल
