सुपर बिल्टअपचा घोळ! 1000 चौ. फुटांचे पैसे द्यायचे, पण घर मिळते 600 चौ. फुटांचे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:26 IST2025-06-11T13:25:13+5:302025-06-11T13:26:15+5:30
देशात घरांच्या किमतीमध्ये अव्वल क्रमांक असलेल्या मुंबईमध्ये आजच्या घडीला सुपर बिल्टअपमुळे एक हजार चौरस फुटांचे घर घेऊनही ग्राहकांना प्रत्यक्षात केवळ ६०० चौरस फुटांचे घर मिळत असल्याचे दिसून आले आहे.

सुपर बिल्टअपचा घोळ! 1000 चौ. फुटांचे पैसे द्यायचे, पण घर मिळते 600 चौ. फुटांचे!
देशात घरांच्या किमतीमध्ये अव्वल क्रमांक असलेल्या मुंबईमध्ये आजच्या घडीला सुपर बिल्टअपमुळे एक हजार चौरस फुटांचे घर घेऊनही ग्राहकांना प्रत्यक्षात केवळ ६०० चौरस फुटांचे घर मिळत असल्याचे दिसून आले आहे. बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या अॅनारॉक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही बाब पुढे आली आहे.
घराच्या आतील प्रत्यक्ष जागेला बिल्टअप एरिया असे म्हटले जाते. तर घरासोबत इमारतीमध्ये किंवा निवासी संकुलात ज्या सुविधा घर खरेदीदार ग्राहकांना दिल्या जातात. त्यांना सुपर बिल्टअप एरिया असे म्हटले जाते. अलीकडच्या काळात मुंबईतील अनेक इमारती तसेस निवासी संकुलांमध्ये ग्राहकांना जिम, स्विमिंगपूल, क्लब हाऊस अशा सुविधा दिल्या जात आहेत. किंबहुना ग्राहकांकडूनदेखील अशा सुविधांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. मर्यादित जागेत अशा सुविधा देताना या सुविधा अधिकाधिक पद्धतीने देताना सुपर बिल्टअप एरिया वाढतो आहे.
३३ टक्के प्रमाण
२०१९ पर्यंत सुपर बिल्टअपचे प्रमाणही आतापेक्षा दहा टक्क्यांनी कमी अर्थात ३३ टक्के इतके होते.
सुविधांच्या मागणीत वाढ
१. आजच्या घडीला मुंबईमध्ये तब्बल ४३ टक्के जागा ही सुपर बिल्टअपमध्ये जाताना दिसत आहे. त्यामुळेच एक हजार चौरस फुटांच्या फ्लॅटची खरेदी मार्केट दराने करुनही ग्राहकांना प्रत्यक्ष राहण्याची जागा ही ६०० चौरस फुटांइतकी मिळत आहे. मुंबईमध्ये २०१९ या वर्षापर्यंत सुपर बिल्टअपचे प्रमाण हे ३३ टक्के इतके होते.
२. २०२२ या वर्षी हे प्रमाण ३९ टक्क्यांवर पोहोचले होते. मात्र, कोरोनानंतर अनेक सुविधांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे हे प्रमाण आता २०२५ च्या तिमाहीत ४३ टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, विकासक जरी सुपर बिल्टअपसह प्रति चौरस फूट आकारणी करीत असले तरी त्यांनी बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया किती प्रमाणात आहे आणि त्याकरिता ग्राहकाला किती पैसे मोजावे लागणार आहेत, याची स्पष्ट कल्पना द्यावी, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.