लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलुंडमधील एलबीएस मार्गावर ‘वडाळा-ठाणे- कासारवडवली मेट्रो ४’ मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या खांबांवरील अंदाजे अडीच मेट्रिक टनाचा सिमेंटचा कठडा (पॅरापेट) कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीचा सद्यस्थिती अहवाल सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला बुधवारी दिले. या अपघातामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली असल्याची बाब ॲड. रूजू ठक्कर यांनी मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली.
ही दुर्घटना हलगर्जीपणामुळे झाल्याची माहिती महाअधिवक्ता मिलिंद साठे यांनी न्यायालयात दिली. त्यामुळे न्यायालयाने एमएमआरडीएला चौकशीचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी २ आठवडे तहकूब केली. वकील रुजू ठक्कर यांनी ही जनहित याचिका केली असून मुलुंड येथील अपघाताच्या कारणांबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित प्राधिकरणांना द्यावेत. तसेच भीषण अपघातानंतरही संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई का सुरू करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण एमएमआरडीएकडे मागावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.
याचिकेत काय?आपण आणि आपले बहुतांश नातेवाईक या परिसरात वास्तव्यास आहेत. परंतु, या अपघातानंतर मेट्रोच्या पुलाखालून, प्रवास करताना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या, तसेच परिसरातील अनेक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, असेही याचिकाकर्तीने याचिकेत म्हटले आहे.