Join us  

'मराठा आरक्षणासाठी गरज पडल्यास घटना बदल करण्याच्यादृष्टीने अभ्यास सुरू'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 2:33 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली

मुंबई - छत्रपती संभाजीराजेंनी गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी, केंद्र सरकारी काही मुव्हमेंट असेल, उदा- घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरू आहे, असे संभाजीराजेंनी म्हटलं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले असताना, पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारले होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या मोर्चात खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. त्यावेळी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल, त्यावेळी तलवारी काढू, असा इशारा देत आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. आता, गरज पडल्यास केंद्र सरकारच्या मुव्हमेंटने घटना बदल करण्याच्या दृष्टीने माझा अभ्यास सुरू असल्याचं संभाजीराजेंनी म्हटंलय. 

“मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसईबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगने म्हटलं आहे, त्यामुळे ते सिद्ध झालं आहे. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. यासाठी राज्य सरकारने तातडीने मदत करावी. मी छत्रपती या नात्याने रयतेसाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वय साधणार आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे असंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. 

संभाजीराजेंनी अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. ''आज सकाळी तामलवाडी येथून अतिवृष्टी नुकसान पाहणी दौऱ्याला सुरवात केली. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकरी स्वतः संकटात असूनही अतिशय धीरोदात्तपणे ते परिस्थितीला सामोरे जात आहेत. सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.'', असे संभाजीराजेंनी म्हटलंय.  

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणकोल्हापूर