मुंबई - पाकिस्तानी व बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) मुंबईतील आझाद मैदान येथे मोठा मोर्चा निघाला होता. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान या मार्गावर या हजारोंच्या उपस्थितीत मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. या मोर्चात मुस्लीम बांधवही उत्स्फुर्तपणे सहभागी होते. मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोर्चातील उपस्थितांना संबोधित केले. यावेळी, देशातील मुस्लीम हा आमचाच असल्याचंही ठणकावून सांगितलं. तसेच, देशातील मुस्लिमांनाही त्यांनी आवाहन केलंय.
भारतात परदेशातून मुल्ला मौलवी येतात, हे मला पोलीस खात्यातूनच समजलंय. हे जे काही घडतंय ते खूप काही मोठं घडविण्याचं षडयंत्र असल्याचं मला त्यांनी सांगितलंय, असे म्हणत यासंदर्भात केंद्र आणि राज्यातील गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे राज यांनी सांगितले. तसेच, एनआरसीबद्दल जे हिंदू, दलित अन् आदिवासी आहेत, त्यांना पुरावे मागू नये, असेही ते म्हणाले. देशभरात ज्यांनी मोर्चे काढले त्यांना हे मोर्चातून दिलेलं उत्तर आहे. तुम्हाला जे स्वातंत्र्य मिळालंय ते जगातील कुठल्याही देशात मिळत नाही. सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे. जो माझा देशप्रेमी मुसलमान आहे, जो माझा मराठी मुसलमान आहे, त्यांनीही जागृत राहिलं पाहिजे. जे काही चाललंय ते त्यांनीही पुढे येऊन सांगितलं पाहिजे, असे आवाहनही राज यांनी केले आहे.