Join us  

...म्हणून आता मनसे करणार बॉम्बवाटप; 'राज'कीय धमाक्याचा इरादा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 5:45 PM

लोकसभा निवडणुकीनंतरही मनसेने केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतरही मनसेने केंद्रातील मोदी सरकारविरोधातील आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. काही महिन्यांवर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी सोनिया गांधींची भेट घेत नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिले होते. दरम्यान, आता देशातील सद्यस्थिती पाहता मनसेकडून बॉम्ब वाटप करण्यात येणार असल्याचा दावा करून मनसेने खळबळ उडवून दिली आहे. 'देशाची आजची परिस्थिती बघता मनसेचे बॉम्बवाटप' असे शीर्षक असलेले बॅनर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, मनसे बॉम्बवाटप करणार आहे. म्हणजे नेमका कुठला राजकीज धमाका करणार याची उत्सुकता निर्माण झाली असून, बॉम्ब वाटपाच्या या फेसबुक पोस्टनंतर आम्ही अभिजीत पानसेंशी संपर्क साधला. तेव्हा, 'हो आम्ही बॉम्ब वाटणार आहोत. लवकरच तारीख जाहीर करू, तेव्हा प्रत्यक्षच या', असं ते म्हणाले. 

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. ईव्हीएमवरील संशय, पुढील निवडणुका मतपत्रिकांद्वारे घेणे व लोकसभा निवडणुकीचा निकाल या विषयांवर सोनिया गांधी यांच्याशी आपण चर्चा केली, असे राज ठाकरे यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले की, ईव्हीएमबाबत मी जे मुद्दे मांडले, त्यांना सोनिया गांधी यांनी दुजोरा दिला. देशाला मोठ्या जन आंदोलनाची गरज असून, त्यासाठी विरोधी बाकांवरील सर्व राजकीय पक्षांना एकत्र यावे लागेल, असेही मी त्यांना सांगितले, असे नमूद करून राज म्हणाले की, शरद पवार यांच्याशीही ईव्हीएमसंदर्भातच आपली चर्चा झाली होती.

अभिजीत पानसे यांनी फेसबूकवर शेअर केलेली यासंदर्भातील पोस्ट 

टॅग्स :राज ठाकरेमनसेराजकारण