... तर डिसेंबरमध्ये सर्वांसाठी लाेकल धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 07:41 IST2020-11-27T07:40:50+5:302020-11-27T07:41:17+5:30
संसर्ग नियंत्रणात आल्यास मुंबई पालिकेचा निर्णय

... तर डिसेंबरमध्ये सर्वांसाठी लाेकल धावणार
मुंबई : मुंबई महापालिकेने मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले असून, दिवाळीनंतर पुढील तीन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली नाही तर १५ डिसेंबरच्या आसपास लोकलसह शाळा सुरू होतील, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीही पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. आरटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्यात आला असून मोठ्या संख्येने फिव्हर क्लिनिक सुरू केले आहेत.
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनीही पोलीस, वॉर्ड स्तरासह लोकप्रतिनिधी स्तरावर कोरोनाला हरविण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सव, नवरात्राेत्सवानंतर दिवाळीत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर परराज्यातून जे नागरिक मुंबईत दाखल होत आहेत, त्यांच्या कोरोना चाचण्या रेल्वे स्थानकांवर केल्या जात आहेत. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढत असली तरी गणेशोत्सव व नवरात्राेत्सवाच्या तुलनेत तो नियंत्रित असल्याचा दावा मुंबई पालिकेने केला आहे.
अशी सुरू आहे कार्यवाही
n ज्या व्यक्तींमध्ये काेराेनाची लक्षणे आढळत आहेत त्यांना तातडीने विलगीकरण कक्षांमध्ये ठेवले जात आहे.
n सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने व नियमित सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
n सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे नियमाचे उल्लंघन करतील, त्यांना दंड आकारणी करण्यात येत आहे