Join us

गाळ उपशाच्या कामाला आला वेग; महापालिकेकडून आतापर्यंत ८२.३१ टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:56 IST

मिठी नदीची सफाईही प्रगतिपथावर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्यात शहर आणि उपनगरात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने नाले, गटारांची सफाई हाती घेतली आहे. पावसाळ्यापूर्वी एकूण नऊ लाख ६८ हजार आठ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत सात लाख ९६ हजार ७६५ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ८२.३१ टक्के गाळ काढण्यात आला आहे, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.

पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून गाळ उपशाचे दरवर्षीचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. तसेच पावसाळ्यादरम्यान १० टक्के, तर उर्वरित कालावधीत १० टक्के गाळ उपसा केला जातो. मुंबईतील पर्जन्यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, हे उद्दिष्ट ठरविले जाते.  मात्र, यंदा ही कामे सुरू असतानाच मे महिन्यात पाऊस पडला. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले.

ऐन मे महिन्यात पाऊस

  • यंदाच्या वर्षी मुंबईत ६ मेपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाचे आगमन वेळेपूर्वी झाल्याने अंशतः परिणाम गाळ काढण्याच्या कामावर झाला.
  • जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रमुख नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे, असेही सांगण्यात आले.

३ कोटींपेक्षा अधिक दंड आकारणी

गाळ काढण्याच्या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर केला जात आहे. एआय निरीक्षणाद्वारे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची आकारणी करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनातर्फे देण्यात आली.

मोठ्या नाल्यांतून ३ लाख टन गाळ काढला

  • मोठ्या नाल्यांमधून पावसाळापूर्व तीन लाख ५७ हजार ४३० मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत तीन लाख ७८ हजार २१४ मेट्रिक टन गाळ काढला आहे. 
  • लहान नाल्यांतून पावसाळापूर्व तीन लाख ९६ हजार २६२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत दोन लाख ८६ हजार चार मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ७२.१८ टक्के आहे. हे काम १०० टक्के पूर्ण होईपर्यंत उपसा सुरू राहणार आहे.
  • मिठी नदीतून पावसाळापूर्व दोन लाख १४ हजार ३१५ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एक लाख ३२ हजार ५४५ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ६१.८५ टक्के आहे.
  • हे काम मागे पडले असले, तरीही अतिरिक्त संसाधनांचा वापर करून हे काम पूर्ण केले जाणार आहे, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले.
टॅग्स :मुंबईनदीमुंबई महानगरपालिका