महाराष्ट्रात उभारणार तब्बल सहा लाख नवीन घरे; महामुंबईतील विविध प्रकल्पांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:54 IST2025-10-28T11:54:07+5:302025-10-28T11:54:46+5:30
प्रकल्पांतर्गत ८ हजार कुटुंबांना प्रत्येकी ५०० चौरस फुटांची घरे मोफत देण्यात येणार

महाराष्ट्रात उभारणार तब्बल सहा लाख नवीन घरे; महामुंबईतील विविध प्रकल्पांचाही समावेश
मुंबई : बी. डी. डी. चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जी. टी. बी. नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, जोगेश्वरीतील पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर, वरळी आदर्श नगर आणि वांद्रे रिक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प असे अनेक प्रकल्प अंमलबजावणीच्या किंवा नियोजनाच्या टप्प्यात आहेत. या प्रकल्पांसह विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील घरातील संख्येत सुमारे सहा लाख नवीन घरे जोडली जातील, अशी अपेक्षा म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केली.
१६ हजार कुटुंबांना आधुनिक घरे
संजीव जयस्वाल म्हणाले, बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे १६ हजार कुटुंबांना आधुनिक घरे विनामूल्य मिळणार आहेत. गोरेगाव येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पुनर्विकास प्रकल्प ठरणार असून, १,६०० चौरस फुटांची घरे त्यामध्ये दिली जाणार आहेत.
ओकामुरा टोमोहीतो म्हणाले, शहरी विकास उपक्रमांना जपानकडून पाठिंबा दिला जाईल. मुंबईत पुनर्विकास व क्लस्टर विकास प्रकल्पांमध्ये आमची सहकार्य करण्याची इच्छाही आहे.
५०० चौरस फुटांची घरे मोफत
शिष्टमंडळाने कामाठीपुरा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाबद्दलही विशेष रस दाखवला. हा प्रकल्प १०० वर्षांहून अधिक जुन्या व मोडकळीस आलेल्या वसाहतींचे रूपांतर करून आधुनिक आणि भविष्याभिमुख शहरी परिसर निर्माण करणार आहे.
प्रकल्पांतर्गत ८ हजार कुटुंबांना प्रत्येकी ५०० चौरस फुटांची घरे मोफत देण्यात येणार असून, त्या परिसराचा ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे.