मुंबई - दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन कन्नडविषयी बोलले तर भाषिक अस्मिता आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलले की, भाषिक दुराग्रह, अशी टीका मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली. तर, उद्धवसेनेकडूनही कधीकधी मराठीचा मुद्दा उचलला जात असल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ हा प्रचारातील एक प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
कमल हसन यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर कोर्टानेही त्यांची शाळा घेतली आहे. तमिळ ही कन्नड भाषेची आई असल्याचे वक्तव्य कमल हसन यांनी केले होते. त्यावरून त्यांच्याविरोधात कर्नाटकात रोष निर्माण झाला आहे. कमल हसन यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी कन्नडवासीयांनी केली होती. मात्र, मी माफी मागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर हा वाद आणखी चिघळला; तसेच न्यायालयाचा संदर्भ देत, नागरिकांसाठी पाणी, जमीन आणि भाषा खूप महत्त्वाच्या आहेत. अशा वक्तव्यांमुळे देशाचे विभाजन होऊ नये, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, असे किल्लेदार यांनी म्हटले आहे.
दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भय्याजी जोशी यांनी, घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचे म्हटले आणि त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे; तसेच उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली. जोशी यांनी असे विधान बंगळुरू किंवा चेन्नई येथे करून दाखवावे, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले, तर आदित्य ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे, असे ठणकावून सांगितले होते.
हिंदी भाषा अनिवार्य करण्यावरही टीकाराज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्राप्रमाणे राज्यात मराठी, इंग्रजीसोबत हिंदी अनिवार्य करण्याच्या राज्याच्या निर्णयावर मनसे आणि उद्धवसेनेने सडकून टीका केली.
परप्रांतीयांचा मुद्दाही येणार ऐरणीवरमुंब्रा-दिवा रेल्वे अपघातानंतर आता पुन्हा मनसेने परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केल्याने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हा मुद्दा प्रचारात गाजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.