Join us  

'मन दूषित असेल तर दृष्टीकोनही तसाच', आदित्य ठाकरेंचं विरोधकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:20 PM

नाइटलाइफच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे.

मुंबई : महानगरी मुंबईत नाइटलाइफ सुरू व्हावे म्हणून गेली काही वर्षे आग्रही असणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा केली. नाइटलाइफच्या निर्णयावर टीका करत अनेकांनी विरोध केला आहे. 'मन दूषित असेल तर दृष्टीकोनही तसाच असतो. टीका करणाऱ्या विरोधकांची मनं प्रदूषित' असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे. 

'महाविकासआघाडी लोकांसाठी काम करत आहे. जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. आमचं मन साफ आहे. रोजगारासाठी हे करत आहोत. नाइटलाइफबाबत आमच्या मनात रोजगाराची संधी आहे' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. बुधवारी (22 जानेवारी) पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. 'मी माझ्या वाढदिवसाला किमान एक झाड लावेन आणि त्याचे संगोपन करेन....' अशी पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मुंबईत नाइटलाइफ सुरू केल्यास हजारो निर्भयासारखे प्रकरणे घडतील असा दावा भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी मंगळवारी केला आहे. मुंबईतील मॉल्स, हॉटेल्स आणि पब्जना 24 तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला. मात्र मुंबईत मद्य संस्कृती लोकप्रिय झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच नाइटलाइफमुळे हजारो निर्भयासारख्या घटना घडतील असा दावा राज पुरोहित यांनी केला आहे. त्याचप्रमाणे भारतासाठी ही संस्कृती योग्य आहे का याचा विचार करावा असं देखील राज पुरोहित यांनी सांगितले आहे. 

नाइटलाइफवरून भाजपाच्या आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेवर निशाणा साधला होता. नाइटलाइफच्या निमित्ताने निवासी भागात 24 तास हॉटेल सुरू ठेवून सामान्य मुंबईकरांची शांतता भंग करणार असाल; तर त्याला आम्ही कडाडून विरोध करू अशा शब्दांत शेलार यांनी विरोध दर्शवला होता. तसेच 'नाइटलाइफ संदर्भातील नियमावली अद्याप प्रसिद्ध व्हायची आहे. ती जाहीर झाल्यावर त्याबाबत सविस्तर भाष्य करू. कायदा आणि सुव्यवस्थेसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार व्हायला हवा. या निर्णयामुळे पोलिसांवर ताण येणार असून, अनेक नवे प्रश्न निर्माण होतील' असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. तसेच छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागणारेच हे करू शकतात. निवासी भागात हॉटेल,पब सुरू ठेवण्यास आमचा विरोधच असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.  

मुंबईमध्ये नाइटलाइफसाठी आग्रही असलेले आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफचा प्रयोग केला जाणार असल्याचं म्हटलं. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स 24 तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेमार्फत आयोजित ‘स्वच्छता सर्वेक्षण 2020’ या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या 

पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, FDAच्या अहवालातून उघड

...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना

ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश

बोलायचे एक व करायचे दुसरेच, भाजपाने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहावा; शिवसेनेचा टोला 

उद्धवा, अजब तुझे सरकार म्हणत मनसे नेत्याने ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाची उडवली खिल्ली

 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनामुंबई