मुंबई - पश्चिम बंगलाच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं बंगालमधील राजकारण तापलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी थेट लढत होणार असल्याचं चित्र दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक नेत्यांनी तृणमूल सोडून भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठं आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेना ममता बॅनर्जींच्या मदतीला धावून गेली आहे. मात्र, यावरुन भाजपा आमदाराने शिवसेनेवर बोचरी टीका केलीय.
बिहारमध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत काही जागा लढवल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येहीशिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. 'शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर याबद्दलची अपडेट मी तुम्हाला देत आहे,' असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभं राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत,' असं राऊत यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात विधानसभा निवडणूक
>> पहिला टप्पा - २७ मार्च मतदान
>> दुसरा टप्पा - १ एप्रिल मतदान
>> तिसरा टप्पा - ६ एप्रिल मतदान
>> चौथा टप्पा - १० एप्रिल मतदान
>> पाचवा टप्पा - १७ एप्रिल मतदान
>> सहावा टप्पा- २२ एप्रिल मतदान
>> सातवा टप्पा- २६ एप्रिल मतदान
>> आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान
२ मे रोजी जाहीर होणार विधानसभेचा निकाल