Join us  

"औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू", कबरीवर फुलं वाहण्यावरुन शिवसेनेचाही संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 8:15 PM

अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली

ठाणे - एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्ग्याला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही या भेटीवरुन अकबरुद्दीन ओवेसींनी थेट इशारा देत राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे. त्यानंतर, आता शिवसेनेनंही अकबरुद्दीन ओवेसींच्या या कबर दर्शनावर टिका केली आहे. 

अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली. माझा एक खासदार आहे, तू तर बेघर आहे. मी तुला काय उत्तर देऊ, अशा शब्दात राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टिका केली. तत्पूर्वी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले वाहिल्यामुळे ओवेसींवर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टिका होत आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी ओवेसींनी लक्ष्य केल्यानंतर नितेश राणे यांनीही टिका केली. राणेंनी राज्य सरकारवरही जबरी प्रहार केला. आता, राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अकबरुद्दीन ओवेसींच्या कबर दर्शनावर टिका केली आहे. 

औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता, त्याने हिंदूंच्या देवस्थानाची, मंदिरांची नासधूस केली. खरं म्हणजे ज्याने स्वराज्याचा द्रोह केला अशा देशद्रोही औरंगजेबाच्या कबरीवर ओवेसीने जे काही केलं त्याचा मी निषेध करतो, अशी संतापजनक प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्री शिंदे आज प्रगती कॉलेजच्या रौप्य महोत्सव निमित्त आयोजित वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा सन्मान सोहळ्याला डोंबिवलीत आले होते. त्यावेळी, त्यांनी औरंगजेब वादावर स्पष्ट मत व्यक्त केलं. 

काय म्हणाले नितेश राणे

या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण, राज्यामध्ये "नामर्दांचे सरकार आहे'', याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व !, अशा प्रखर शब्दात नितेश राणेंनी राज्य सरकारवर जहरी टिका केली आहे. तसेच, मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर...आम्ही शिवरायांचे मावळे नाही !, असा इशाराही राणेंनी ट्विटरवरुन दिला आहे. 

जलील यांचं स्पष्टीकरण

इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, दरगाहवर जाणे आणि तेथे जाऊन ‘दरूद शरीफ’ पडणे ही आमची संस्कृती आहे. ओवेसी यांनी जाणीवपूर्वक औरंगजेब यांच्याच कबरीवर पुष्प अर्पण केले नाही, तर या भागातील विविध थोर सुफींच्या दरगाहमध्ये जाऊन चादर-पुष्प अर्पण केले. कोणतेही कारण नसताना विरोधकांकडून वाद उकरून काढण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनशिवसेनाएकनाथ शिंदे