Join us  

शरद पवारही अडचणीत?; राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी चौकशीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 7:23 PM

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला (ईवोडब्ल्यू) दिले होते.

मुंबई - महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये सर्वपक्षीय 76 नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहेत. या घोटाळ्यात संबंधित खात्याचे अधिकारी आणि तत्कालीन मंत्र्यांची नावंही आरोपी म्हणून देण्यात आल्याचा दावा तक्रारदाराच्या वकिल माधवी अय्यपम यांनी केला आहे. त्यामुळे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला (ईवोडब्ल्यू) दिले होते. त्यानुसार २५00 कोटींच्या कर्जवाटप घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते-पाटील आणि शिवाजीराव नलावडे यांच्यासह अन्य बड्या नेत्यांविरोधात माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित पवारांसह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये 76 जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५,00 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी येत्या पाच दिवसांत बँकेचे तत्कालीन संचालक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, जयंत पाटील, दिलीपराव देशमुख, पांडुरंग फुंडकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह ७६ संचालकांवर गुन्हा नोंदवा, असे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (ईओडब्ल्यू) मागील गुरुवारी दिले. या ७६ जणांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेच्या नेत्यांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना आज अजित पवारांसह बड्या नेत्यांविरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बँक घोटाळ्यात सकृतदर्शनी या सर्वांविरोधात ‘विश्वसनीय पुरावे’ आहेत, असे मत न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबरोबर शेकापचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण इत्यादी नेत्यांचा यात समावेश आहे. त्याशिवाय राज्यातील ३४ जिल्हा बँकांचे वरिष्ठ अधिकारीही या घोटाळ्यात सहभागी आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिकेद्वारे केला आहे. अजित पवार राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना त्यांनी साखर कारखाने, सूत गिरण्यांना कर्ज देताना रिझर्व्ह बँक आणि बँकेशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केले, असा आरोप आहे. परिणामी कर्जाची वसुली झाली नाही, असे नाबार्डने तपासणी अहवालात म्हटले आहे.नाबार्डचा तपासणी अहवाल आणि अन्य विश्वसनीय पुराव्यांवरून सकृतदर्शनी भारतीय दंड संहिता व अन्य काही कायद्यांखाली हा दखलपात्र गुन्हा ठरतो. त्यामुळे आम्ही ईओडब्ल्यूला पाच दिवसांत यासंबंधी गुन्हा नोंदविण्याचा आदेश देतो. त्यानंतर पुढे कायद्यानुसार योग्य ते पाऊल उचलावे, असा आदेशही न्यायालयाने दिला.

बँकेतील या २५00 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अरोरा यांनी ईओडब्ल्यूकडे तक्रार केली होती. मात्र, कारवाई न केल्याने त्यांनी अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. या प्रकरणी ईओडब्ल्यूला गुन्हा नोंदविण्याचा आदेश द्यावा किंवा तपास सीबीआयकडे वर्ग करावा आणि पुढील तपास सीबीआयच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी विनंती तळेकर यांनी न्यायालयाला केली होती.   

दरम्यान, याचिकाकर्त्याच्या तक्रारीत 166 आणि 120 बी अंतर्गत शरद पवार यांचेही नाव दाखल करण्यात आले आहे. तसेच, जवळपास 300 पेक्षा अधिक आरोपींची नावे या घोटाळ्यात दाखल झाली आहेत, असेही याचकाकर्त्यांच्या वकिल अयप्पम यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीन्यायालयशरद पवारअजित पवार