पाचशे-हजार रुपयांच्या भाड्यापायी सुरक्षा ऐरणीवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 23:29 IST2019-03-03T23:29:11+5:302019-03-03T23:29:19+5:30
मालाडच्या साईनाथ मंडईला ‘दुसरे दादर’ म्हणून ओळखले जाते.

पाचशे-हजार रुपयांच्या भाड्यापायी सुरक्षा ऐरणीवर!
- गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : मालाडच्या साईनाथ मंडईला ‘दुसरे दादर’ म्हणून ओळखले जाते. सध्या मुंबईत हाय अलर्टच्या वातावरणात या बाजारपेठेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या मंडईत साडेचारशे परवानाधारक व्यापारी आहेत. यातील साठ टक्के व्यापारी हे वृद्धत्व, आजारपण, तसेच गावी राहत असल्याने, स्वत:चे दुकान त्यांनी अन्य व्यक्तीला चालविण्यास दिले आहे. मात्र, दुकानाचे भाडे परवडत नसल्याने हे चालक ५०० ते १००० रुपये भाडे आकारून फेरीवाल्यांना छोटेमोठे धंदे करण्याची परवानगी देतात.
मंडईच्या सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊनच २३ मार्चला आम्ही व्यापाऱ्यांसोबत एक मीटिंग घेणार आहोत. आम्ही सुरक्षारक्षक तैनात करणार असून, महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही स्वखर्चाने बसविणार आहोत, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष श्रीकृष्ण नलावडे यांनी दिली़ आम्ही फेरीवाल्यांवर कारवाई करायला जातो. तेव्हा ते तिथून पळून जातात, असे पालिका बाजार विभागाचे अधीक्षक अशोक धडाम यांनी सांगितले़
>विसर्जन तलाव
बनला बाजारपेठ!
आता साईनाथ मंडई म्हणून ओळखली जाणारी बाजारपेठ मुळात एक विसर्जन तलाव होता. फेरीवाला सोसायटीच्या नावाने तो ओळखला जात होता. कोळशाचा व्यापारी ही जागा वापरत होता. मात्र, १९६७ मध्ये व्यापारी वर्गाने यासाठी आंदोलन केले आणि अखेर ती जागा व्यापाऱ्यांना मिळाली.
स्वच्छतेची बोंबच!
बाजारात स्वच्छता कर्मचारीदेखील पुरेसे नाहीत. आठ ते दहा कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर इतक्या मोठ्या बाजाराच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे, जे प्रत्यक्षात त्यांना शक्य होत नाही.