Join us  

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका, देशांतर्गत विमान प्रवाशांत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 6:54 AM

domestic flights : मार्च २०२०मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंर विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. २५ मेपासून हे निर्बंध शिथिल करून देशांतर्गत विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने खुली करण्यात आली.

मुंबई : कोरोनामुळे मंदावलेली हवाई वाहतूक क्षेत्राची गती फेब्रुवारी महिन्यात पूर्ववत होत असल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु, मार्चपासून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागल्याने पुन्हा प्रवाशांनी विमान प्रवासाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलच्या पहिल्या पंधरावड्यात देशांतर्गत विमान प्रवाशांत १२ टक्के घट नोंदविण्यात आली.मार्च २०२०मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंर विमान वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले. २५ मेपासून हे निर्बंध शिथिल करून देशांतर्गत विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने खुली करण्यात आली. डिसेंबरपासून प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली. फेब्रुवारी महिन्यात एकूण देशांतर्गत विमान वाहतूक गेल्यावर्षीच्या तुलनेत ६४ टक्के इतकी नोंदविण्यात आली होती. परंतु, मार्चपासून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे पुन्हा प्रवासीसंख्या रोडावली आहे.‘आयसीआरए’ या संस्थेच्या अहवालानुसार, मार्च २०२१ मध्ये दिवसाला सरासरी २ लाख ४९ हजार प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. मात्र ६ एप्रिलपासून सातत्याने प्रवासी संख्या कमी होत असून, गेल्या १५ दिवसांत त्यात ११ ते १२ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. विशेषतः दिल्ली आणि मुंबई या वर्दळीच्या विमानतळांवर लागू केलेल्या निर्बंधांमुळे पुढील १५ दिवसांत देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत १५ ते १७ टक्के घट होण्याचा अंदाज आहे.

- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध राज्यांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रात तर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. संचारबंदीमुळे नागरिकांनीही अनावश्यक प्रवास टाळला आहे. शिवाय मुंबई, दिल्ली आणि गोवा या वर्दळीच्या विमानतळावर नियमावली कडक केल्याने प्रवासी संख्येत घट झाल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस