साकिब नाचनचे मुंबई कनेक्शन : एका टेररचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:06 IST2025-06-29T12:05:59+5:302025-06-29T12:06:19+5:30

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये २००२-२००३ साली झालेले भीषण बॉम्बस्फोट आजही मुंबईकरांच्या अंगावर शहारे आणतात.

Saqib Nachan's Mumbai Connection: The End of a Terror | साकिब नाचनचे मुंबई कनेक्शन : एका टेररचा अंत

साकिब नाचनचे मुंबई कनेक्शन : एका टेररचा अंत

रवींद्र राऊळ

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये २००२-२००३ साली झालेले भीषण बॉम्बस्फोट आजही मुंबईकरांच्या अंगावर शहारे आणतात. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, विलेपार्ले आणि मुलुंड येथे अनेक मुंबईकरांचे निर्घृण बळी घेणाऱ्या त्या साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार होता कुख्यात साकिब नाचन. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची प्रगती देशाविरुद्ध युद्ध लढण्याची खुमखुमी असलेल्या साकिब नाचनच्या डोळ्यांत आयुष्यभर चांगलीच खुपत होती. महाराष्ट्राला आयसिसचे राज्य करण्याची सुरुवात मुंबईतून करायची हे उद्दिष्ट त्याच्यासमोर स्पष्ट होते आणि त्यासाठीच तो आयसिस मोड्यूलचा प्रमुख झाला होता.

अमोनियम नायट्रेटच्या साहाय्याने देशभरात पन्नासहून अधिक बॉम्बस्फोट घडवून आणणारा कुख्यात डॉ. जलिस अंसारी हा साकीब नाचनचा आदर्श. १९९०च्या दशकात आग्रीपाड्याच्या आपल्याच क्लिनिकमध्ये बॉम्ब तयार करणाऱ्या डॉ. जलिस अन्सारी याने मुंबईतील पोलिस ठाण्यांना लक्ष्य करत अनेक बॉम्बस्फोट घडवले होते. त्याच्या पावलावर पाऊल टाकत भविष्यात मुंबई महानगरात घातपाती कारवाया करण्यासाठी नाचननेही बॉम्बसाठी लागणारे इम्प्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिवाइस (आयईडी) तयार करण्याचे तंत्रज्ञान स्वत:च शिकून घेतले होते. घातपात घडवण्याचे काम त्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर करायचे होते की त्याने आपला मुलगा शमिल नाचन यालाही त्यात निष्णात केले.

इतक्यावरच तो थांबला नाही तर पुण्याच्या कोंढवा भागात एक मोठे घर घेऊन तेथे त्याने चक्क एका बॉम्ब तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात बॉम्ब प्रशिक्षण आणि तयार करण्याचे काम सुरू केले होते. आपण बनवलेल्या बॉम्बची क्षमता पडताळून पाहण्यासाठी तेथे त्याने नियंत्रित बॉम्बस्फोटही घडवल्याचे पोलिसांना आढळले. ही त्याची सारी तयारी होती ती मुंबई नेस्तनाबूत करण्यासाठी. 

२००२ आणि २००३ साली मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोटांसाठी जी वापरलेली स्फोटके पाकिस्तानातून भारतात आणणारे अबू सुलतान, अबू अन्वरअली आणि महंमद इक्बाल वानी हे तिघे अतिरेकी गोरेगाव येथील चकमकीत मारले गेले तेव्हाच त्यात साकीब नाचनचा सहभाग उघडकीस आला.

बॉम्ब लोकलमध्ये पेरण्यासाठी लागणारी सारी मदत साकिब नाचननेच त्या अतिरेक्यांना केली होती. त्या खटल्यात शिक्षा भोगून २०१७ साली बाहेर पडल्यावर तो पुन्हा फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी झाला, तेव्हा त्या काळात साकिब आता काय उत्पात घडवतो, याचीच धास्ती कायम तपासयंत्रणांना असे. २०२३ साली एनआयएने त्याला पकडून तिहार तुरुंगात डांबले तेव्हाही तो स्वस्थ बसला नाही. तेथूनही त्याने अनुयायांना आदेश देत कारवाया सुरूच ठेवल्या होत्या.

स्वत:च्या पुस्तकात सरकार, न्यायव्यवस्थेवर कठोर टीका

साकिब नाचनचा इतिहासच पूर्णपणे देशद्रोहाने भरलेला आहे. त्याने एक पुस्तकही लिहिले होते. त्यात सरकार आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर कठोर शब्दांत टीका केली होती.

देशात अराजक आणि अव्यवस्था निर्माण करण्याचा तसेच समाजातील दोन गटांत कायम तणाव कसा वाढेल, असाच हेतू त्याच्या लिखाणात  होता. ते पुस्तक त्याने मुंबईत मोठ्या प्रमाणावर आपल्या अनुयायांना वितरित केले होते.

तणाव वाढवण्यासाठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी असे. अनेकदा तो मुंबईतील न्यायालयांमध्ये वकील न घेता स्वतःचा बचाव स्वतःच करताना दिसत असे.

Web Title: Saqib Nachan's Mumbai Connection: The End of a Terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.