Join us  

संजय राऊतांचं ट्विट चर्चेत, हमको तो तलाश नये रास्तों की है...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 8:22 AM

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत

ठळक मुद्देपरमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत

मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यानंतर, विरोधकांनी सरकारला आणि गृहमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही अतिशय धक्कादायक घटना असल्याचं म्हटलंय. याबाबत, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. पण, आज ट्विट करुन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले. तर, दुसरीकडे अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत ट्विट केलंय. फडणवीस यांच्याप्रमाणेच अनेक भाजपा नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले असून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं.  संजय राऊत यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना, मला याबाबत माहिती नाही, या आरोपांची मला कल्पना नाही. त्यामुळे, मला सध्या काहीही बोलायचं नाही, असे म्हटले होते. त्यानंतर, राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत आपलं मत व्यक्त केलंय. त्यांनी नेहमीप्रमाणेच शायरीतून अंदाजे बयाँ.. अशारितीने सर्वांनाच संभ्रमात टाकलंय. हमको तो तलाश बस नये रास्तों की है  हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल सेआए है...

असे ट्विट राऊत यांनी केलंय. त्यामुळे, राऊत यांच्या या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न अनेकांना पडलाय. तर, प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार या शायराना ट्विटचा अर्थ घेत आहे. 

जयंत पाटील म्हणतात...

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके व त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यातून कोणीही सुटू नये, यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचे पत्र म्हणजे कोणाची तरी सहानुभूती मिळवून या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचाच प्रकार आहे, असा आरोप जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केला

अमृता फडणवीस यांचीही टीका 

अमृता फडणवीस यांनीही वाझे प्रकरणात उडी घेतली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडेलल्या स्फोटकांवरुन राज्यात सुरु असलेल्या घडामोडीवर भाष्य करताना अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर दोन दिवसांपूर्वीच निशाणा साधला होता. "व्यवहार माझे, जबाबदार वाझे!, सांगा पाहू कोणकोणास म्हणाले", असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. (amruta fadnavis tweet on sachin vaze case ) त्यानंतर, आता परमबीर सिंग यांच्या पत्रानंतरही अमृता फडणवीस यांनी आपलं मत मांडलंय. बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?,

असे ट्विट अमृता यांनी केलंय. अमृता यांच्या ट्विटचा रोख मुख्यमंत्री अन् गृहमंत्री यांच्याकडे असल्याचं दिसून येतंय. कारण, परमबीरसिंग यांच्या पत्राचे वृत्त माध्यमांत झळकताच त्यांनी हे ट्विट केलंय.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनापरम बीर सिंगअनिल देशमुख