भय इथले संपत नाही... मुंबईतील इमारती धोकादायक यादीत; मात्र राहायला जायचे तरी कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:11 IST2025-06-02T15:09:07+5:302025-06-02T15:11:46+5:30

गिरगावात पुनर्वसनासाठी विकासक उदासीन

sad reality Buildings in Mumbai on dangerous list; but where to go to live | भय इथले संपत नाही... मुंबईतील इमारती धोकादायक यादीत; मात्र राहायला जायचे तरी कुठे?

भय इथले संपत नाही... मुंबईतील इमारती धोकादायक यादीत; मात्र राहायला जायचे तरी कुठे?

महेश पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या मराठीबहुल गिरगावात गेल्या १०० वर्षांपासूनच्या अनेक छोट्या-मोठ्या जुन्या इमारती आहेत. मात्र, इमारती धोकादायक असल्या तरी राहायला जायचे कुठे?, असा येथील रहिवाशांचा सवाल आहे. येथील घरे लहान, पण त्यांच्या किमती जास्त आहेत. तसेच अरुंद गल्ल्या, कमी जागा अशा कारणांमुळे विकासक पुनर्विकासाबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. म्हाडाने गिरगावमधील महर्षी कर्वे रोड, दुभाष लेन येथील काही इमारती, शेनवी वाडीतील विष्णू निवास, मंचाराम निवास, खाडिलकर रोडवरील कल्याण बिल्डिंग, अनुबेन निवास यांना ‘अत्यंत धोकादायक इमारती’ म्हणून घोषित करून त्यांना नोटीस पाठविली आहे. मात्र, आर्थिक अडचणी आणि कायदेशीर अडथळ्यांमुळे काहींनी इतर ठिकाणी स्थलांतर करण्यास नकार दिला आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका आणि म्हाडा प्रशासनाकडून धोकादायक इमारती जाहीर होतात. रहिवाशांनी धोकादायक इमारतीत राहू नये, असे आवाहन केले जाते. मात्र, रहिवाशांची पर्यायी व्यवस्था होत नाही. जुन्या चाळींचा पुनर्विकास रखडतो. काही ठिकाणी विकासक पुनर्विकासाठी उत्साह दाखवत नाही. म्हाडाच्याही काही इमारती वर्षानुवर्षे पुनर्विकासाविना तशाच राहतात. धोकादायक इमारतींची अशी अनेक दुखणी आहेत. त्यामुळे रहिवासी नाईलाजाने तेथेच राहतात. मात्र, ते सतत भयाच्या सावटाखाली असतात. वर्षानुवर्षे हा खेळ सुरू आहे. मुंबईतील धोकादायक इमारती आणि तेथील रहिवाशांची स्थिती याचा ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घेतलेला आढावा...

गिरगावात पुनर्वसनासाठी विकासक उदासीन

अनुबेन निवास ही ब्रिटिशकालीन इमारत आहे. येथे अनेक ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. ते म्हणाले, दुरुस्तीच्या कामासाठी म्हाडाकडे पैसे भरले आहेत. आयुष्यातील उर्वरित काळाची समस्या सुटेल या आशेने पैसे भरले होते. पण, आता पुन्हा पैसे मागितले जात आहेत. ते देण्याची आमची क्षमता नाही. एका विंगमधील रहिवाशी पैसे भरायला तयार आहेत तर दुसऱ्या नाही. त्यामुळे संपूर्ण इमारतच अडचणीत आली आहे. मालक आणि भाडेकरू यांच्यात मतभेद आहेत. तर, लहान जागेमुळे विकसक पुढे येण्यास तयार नाहीत.

दुरुस्ती केलेल्या इमारतीही ‘धोकादायक’

कल्याण बिल्डिंगमधील रहिवाशांनी मार्च २०२५ मध्ये म्हाडाच्या सूचनेनुसार इमारतीची आवश्यक दुरुस्ती केली होती. तरीही, त्यांना सी-१ श्रेणीची नोटीस पाठविण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आम्ही इथे अनेक वर्षे राहत आहोत. या इमारतीमध्येच राहावे यासाठी म्हाडाच्या सूचनेनुसार दुरुस्ती पूर्ण करूनही इमारतीला धोकादायक का घोषित करण्यात आले? सक्तीची नोटीस पाठवून आमची इमारत रिकामी करून घेऊन कुणाला देणार आहात? असा सवाल रहिवाशांनी केला.

खोताची वाडी परिसरात सुमारे ४० बंगले आहेत. येथे पूर्वी मराठी कुटुंबे राहत होते. त्यातील २० ते २२ बंगल्यांमध्येच आता मराठी कुटुंबे वास्तव्यास आहेत. या बंगल्याना हेरिटेज वास्तूचा दर्जा असल्यामुळे त्यांचा विकास किंवा नूतनीकरणाचे काम करता येत नाही. खाऱ्या पाण्यामुळे जमिनीच्या टाइल्स निखळतात. पावसाळयात परिस्थिती भयाण असते. ज्यांची ऐपत आहे ते वेळोवेळी लहानसहान दुरुस्ती कामे करतात. पण, काहींची ऐपत नसल्यामुळे काहींची अवस्था खराब झाली आहे.
-आनंद शिंदे, बंगल्याचे भाडेकरू

चार बिल्डिंगमध्ये फक्त ८ जण राहतात. मालकाला १,१०० रुपये भाडे मिळते. त्यातील ८०० रुपये टॅक्स जाऊन ३०० रुपये मालकाच्या खिशात उरतात, तरीही मालकांनी स्वखर्चाने दुरुस्ती केली.
-व्यंकटेश सुभैया, आयडियल वेफर्स कंपाउंड

धोकादायक इमारतीबाबत महापालिका, म्हाडाकडे अनेकदा तक्रारी केल्या. पावसाळा आला की, इमारतींना अचानक नोटीस देतात. रहिवाशांचे कुठे पुनर्वसन करणार, याबाबत माहिती दिली जात नाही. आम्ही स्वखर्चाने वेळोवेळी दुरुस्ती करत असतो; पण पालिका, म्हाडाकडून योग्य सहकार्य मिळत नाही.
-
प्रसाद अंबावकर, भाडेकरू

Web Title: sad reality Buildings in Mumbai on dangerous list; but where to go to live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई