Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:17 IST

हजारो झोपडीधारकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवणारे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर तुकाराम कदम यांना नुकतेच 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

घाटकोपर परिसरातील हजारो झोपडीधारकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवणारे सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर तुकाराम कदम यांना नुकतेच 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेत्री सई ताम्हणकर, मुरली शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

पाण्यासाठी अनेक महिने केला 'पादत्राणांचा त्याग'

परमेश्वर कदम यांचे कार्य त्यांच्या असामान्य सेवाभावी वृत्तीमुळे लक्षवेधी ठरते. कामराज नगर, घाटकोपर येथील लोकांना मागील २५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होत होते. ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी कदम यांनी एक महत्त्वपूर्ण शपथ घेतली. "जोपर्यंत येथील जनतेला पिण्याचे पाणी मिळणार नाही, तोपर्यंत मी पादत्राणे घालणार नाही," अशी शपथ घेत त्यांनी अनेक महिने अनवाणी राहून अथक काम केले. त्यांच्या या प्रामाणिक संघर्षामुळे अखेर लोकांना पाणी मिळाले आणि त्यानंतरच त्यांनी पुन्हा चप्पल परिधान केली. त्यांची ही कृती खऱ्या नेतृत्वाचे आणि लोकांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.

झोपडपट्टी पुनर्वसनात महत्त्वाची भूमिका

परमेश्वर कदम हे एक असे व्यक्तिमत्त्व आहेत, ज्यांनी केवळ पाण्यावरच नव्हे, तर कामराज नगरमधील हजारो कुटुंबांच्या पुनर्वसनासाठीही मोठे कष्ट घेतले. २००५ साली त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. त्यांच्या या चिकाटीने आणि संघर्षाने प्रेरित होऊन त्यांनी कामराज नगरच्या झोपडीधारकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून त्यांना मानवतेची खरी ओळख करून दिली. त्यांच्या याच बहुमोल कार्याचा गौरव म्हणून त्यांना 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Water Warrior Honored: Gave Up Footwear for Community's Water Needs.

Web Summary : Parameshwar Kadam, honored with 'Maharashtra Samaj Bhushan,' transformed lives in Ghatkopar. He vowed to go barefoot until water was provided, resolving a 25-year crisis. He also facilitated slum rehabilitation, improving thousands of lives through dedication.
टॅग्स :मुंबईसमाजसेवक