ई-चालान भरले नाही तर आरटीओ करणार कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:55 IST2026-03-24T11:55:57+5:302026-03-24T11:55:57+5:30
या प्रकल्पासाठी ११.८० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ई-चालान भरले नाही तर आरटीओ करणार कॉल
महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य परिवहन विभाग कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित ‘एआय कॉलिंग’ प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत आहे. या प्रणालीद्वारे प्रलंबित ई-चालानची वाहनधारकांपर्यंत पोहोचवण्यात येणार असून स्वयंचलित फोन कॉल करून प्रलंबित ई-चालान भरण्यासाठी आठवण करून दिली जाईल तसेच रस्ता सुरक्षेच्या नियमांविषयी जनजागृतीही केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी ११.८० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात रस्ते वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून ई-चालानद्वारे होणाऱ्या दंडाच्या वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या जारी होणाऱ्या ई-चालानांपैकी केवळ ४० टक्के दंडाचीच वसुली होत असून उर्वरित ६० टक्के प्रकरणांत वाहनधारकांकडून दंड भरला जात नाही. परिणामी, नियमभंग करणाऱ्यांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ठाण्यातून उत्तम प्रतिसाद
ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) प्रायोगिक तत्त्वावर एआय कॉलिंग यंत्रणा सुरू केली होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमाला ठाण्यात चांगला प्रतिसाद मिळत असून दंड वसुलीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही ‘एआय कॉलिंग’ प्रणाली संपूर्ण राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांत लागू करण्याचा प्रस्ताव होता. त्याला आता मंजुरी मिळाली आहे.
स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापनाच्या ‘एआय कॉलिंग’सारखे उपक्रम हे भविष्यातील स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे केवळ दंड वसुलीच वाढणार नाही, तर वाहनधारकांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत शिस्तही निर्माण होईल, असा विश्वास परिवहन विभागाने व्यक्त केला आहे.
कशी काम करेल एआय कॉलिंग
ई-चालान थकबाकी असलेल्या वाहनधारकांची यादी प्रणालीत अपलोड
स्वयंचलित फोन कॉलद्वारे दंडाची माहिती आणि दंड भरण्याची सूचना
स्थानिक भाषेत संवाद साधून जागरूकता वाढविणे
आवश्यक असल्यास पुनःकॉल करून मागोवा घेणे