तापमान घसरले तरी मुंबईकरांना का सोसावा लागतो उकाडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:01 IST2026-03-31T12:01:07+5:302026-03-31T12:01:07+5:30
आर्द्रतेमुळे अस्वस्थतेत वाढ; उकाड्याने नागरिक हैराण

तापमान घसरले तरी मुंबईकरांना का सोसावा लागतो उकाडा?
मुंबई : मुंबईत उन्हाळ्याची चाहूल लागताच उकाडा आणि आर्द्रतेच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः शुक्रवार, शनिवारी हवामानात झालेल्या बदलांमुळे मुंबईकरांना प्रचंड घाम आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवेमधील आर्द्रता वाढल्याने शरीरातील घाम पटकन आटत नाही, त्यामुळे अस्वस्थता वाढते आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, जेव्हा हवेमध्ये ओलावा जास्त असतो, तेव्हा कोरडे वारे वाहत नाहीत. परिणामी वातावरण अधिक दमट बनते आणि घाम येण्याचे प्रमाण वाढते. मुंबईचे तापमान सध्या ३४ ते ३५ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात असले तरी आर्द्रतेमुळे ते अधिक जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाडा सहन करणे कठीण होत आहे. याउलट, जेव्हा हवेमधील आर्द्रता कमी असते, तेव्हा वाहणारे वारे कोरडे असतात. अशा परिस्थितीत घाम कमी येतो आणि उकाड्याची तीव्रता तुलनेने कमी जाणवते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अशीच परिस्थिती होती. त्या काळात कोरडे वारे वाहत होते.
पूर्वेकडून येणारे उष्ण वारे आणि समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये समतोल साधला न गेल्याने कमाल तापमानात वाढ होते.