रिक्षा-टॅक्सी, बस चालकांविरोधात तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 03:17 IST2016-09-26T03:17:43+5:302016-09-26T03:17:43+5:30
प्रवाशांशी चांगली वर्तवणूक न ठेवणाऱ्या टॅक्सी, आॅटोरिक्षा, सार्वजनिक प्रवासी बस चालकांविरोधात मुंबईकरांनी तक्रारींचा पाऊसच पाडला आहे.

रिक्षा-टॅक्सी, बस चालकांविरोधात तक्रारींचा पाऊस
मुंबई : प्रवाशांशी चांगली वर्तवणूक न ठेवणाऱ्या टॅक्सी, आॅटोरिक्षा, सार्वजनिक प्रवासी बस चालकांविरोधात मुंबईकरांनी तक्रारींचा पाऊसच पाडला आहे. २0११-१२ ते २0१५-१६ या पाच वर्षांत मुंबईतील तिन्ही आरटीओमध्ये एकूण १४ हजार ९४७ तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये अंधेरी आरटीओत ५0 टक्के तक्रारींचा समावेश आहे.
मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक प्रवासी बस चालकांविरोधात प्रवाशांशी गैरवर्तवणूक केल्याच्या तक्रारी आरटीओच्या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध होतात. प्रवाशांना भाडे नाकारणे, उद्धट वर्तणूक, अवाजवी भाडे मागणे, बस थांब्यावर न थांबणे याद्वारे तक्रारी आरटीओकडे प्राप्त होतात. प्रवाशांना तक्रार करता यावी, यासाठी १८00-२२0११0 हा टोल फ्री क्रमांकही मुंबईकरांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या क्रमांकावर २४ तास सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध तक्रार नोंदविता येते. त्याप्रमाणे, पाच वर्षांत ताडदेव, अंधेरी आणि वडाळा आरटीओत एकूण १४ हजार ९४७ तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये ताडदेव आरटीओत ३ हजार ९१, अंधेरी आरटीओत ७ हजार ३३0 आणि वडाळा आरटीओमध्ये ४ हजार ५२६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २0१५-१६ मध्ये एकूण १हजार १२९ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)
टोल फ्री क्रमांक हे २४ तास उपलब्ध आहेत. तक्रारदारकर्त्यांना टोल फ्री क्रमांकावर पुढीलप्रमाणे माहिती देणे अपेक्षित आहे.
वाहन क्रमांक, वाहन प्रकार, घटनेची तारीख व वेळ, घटनेचे ठिकाण, तक्रारदारकर्त्याचे नाव व पत्ता, तसेच मोबाइल आणि निवासी दूरध्वनी क्रमांक.