मान्सून परतीच्या प्रवासाला, जोर १९ सप्टेंबरनंतर कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 06:36 IST2019-09-15T06:35:57+5:302019-09-15T06:36:03+5:30

उत्तर भारतातील काही राज्यांसह महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढणारा मान्सून सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परतीच्या प्रवासाला निघणार आहे.

The return to the monsoon, the emphasis will be less after September 19th | मान्सून परतीच्या प्रवासाला, जोर १९ सप्टेंबरनंतर कमी होणार

मान्सून परतीच्या प्रवासाला, जोर १९ सप्टेंबरनंतर कमी होणार

मुंबई : उत्तर भारतातील काही राज्यांसह महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढणारा मान्सून सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परतीच्या प्रवासाला निघणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागासह स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार, १९ सप्टेंबरनंतर मान्सूनचा जोर कमी होईल आणि याच कालावधीत मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल.
मान्सूनचा हंगाम हा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचा आहे. जून महिन्यात मान्सूनला सुरुवात होते. सप्टेंबर महिना मान्सूनच्या परतीचा महिना म्हणून ओळखला जातो. मान्सूनचा हंगाम सुरू होण्याच्या तारखेत फार मोठी तफावत आढळत नाही. परंतु परतीच्या तारखांमध्ये मोठी तफावत आढळते, असा निष्कर्ष स्कायमेटने काढला आहे. मान्सूनच्या परतीची दिनांक १ सप्टेंबर आहे. परंतु काही वेळेस ती दुसºया पंधरवड्यापर्यंत पोहोचते आणि कधीकधी त्यापलीकडेही जाते.
मान्सूनच्या परतीची सुरुवात राजस्थानच्या पश्चिम भागातून होते. एकाचवेळी पंजाब, हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमधून मान्सून माघारी फिरतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या प्रक्रियेचा कोणताही प्रकारचा ठरावीक पॅटर्न, दिनांक किंवा वेग निश्चित नाही. सामान्यत: सप्टेंबरच्या
उत्तरार्धात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो.
>येथून घेणार माघार
सुरुवातीला मान्सून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरयाणासह पश्चिम राजस्थानमधून माघार घेईल. त्यानंतर इतर ठिकाणांहून हळूहळू माघार घेईल. या सर्व भागांत पाऊस कमी झाला असून नजीकच्या काळात लक्षणीय पाऊस अपेक्षित नाही.
>असा सुरू होतो
परतीचा प्रवास
मान्सून परतलेला आहे हे जाहीर करण्यासाठी अनेक गोष्टी विचारात घेतल्या जातात.
एखाद्या भागात एकूण पाच दिवस पाऊस थांबणे.
वातावरणातील खालच्या थरात प्रतिचक्रवात निर्माण होण्यासोबत आर्द्रतेच्या पातळीत घट होणे.
तापमानात वाढ, ढगांचे प्रमाण कमी होणे.
मान्सूनचा माघारीचा प्रवास एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी जवळपास तीन ते चार आठवडे लागतात.

Web Title: The return to the monsoon, the emphasis will be less after September 19th