गारपीटग्रस्त शेतकर्यांचा मदतीसाठी आक्रोश
By Admin | Updated: May 7, 2014 02:47 IST2014-05-06T17:56:22+5:302014-05-07T02:47:26+5:30
फेबु्रवारी-मार्चमध्ये झालेल्या अवकाळी गारपीटग्रस्त पावसाने पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

गारपीटग्रस्त शेतकर्यांचा मदतीसाठी आक्रोश
पंढरपूर : फेबु्रवारी-मार्चमध्ये झालेल्या अवकाळी गारपीटग्रस्त पावसाने पंढरपूर तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने मदतीसाठी दिलेल्या अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिल्याने मदत मिळावी यासाठी शेतकर्यांचा आक्रोश सुरू आहे. सोमवारी दिवसभर तक्रारी देण्यासाठी शेतकर्यांनी तहसील कार्यालयात गर्दी केली होती. सलग तीन वर्षे पडलेल्या दुष्काळातून मागील वर्षी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी सावरला आहे. उजनी धरण, नीरा-देवधरसह तिसंगी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकर्यांनी मोठ्या उत्साहाने पिकांची पेरणी केली. जिल्हा बॅँकेतून कर्ज पुरवठा न झाल्याने खाजगी सावकारांकडून कर्ज काढून शेतकर्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांची जोपासना केली होती. मात्र फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या अवकाळी गारपीटग्रस्त पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. द्राक्षे, डाळिंब, केळी, पपई, कलिंगड आदी फळबागा तर भुईसपाटच झाल्या. तर ऊस, मका, भुईमूग, ज्वारी आदी पिकांचेही नुकसान झाले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना देखील शासनाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत तत्काळ निधी देखील दिला. मात्र पंढरपूर तालुक्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनी चुकीच्या पध्दतीने पंचनामे केल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले तर काही शेतकर्यांना दोन वेळा अनुदान वाटप केले, काही शेतकर्यांना नुकसानीपेक्षा जादा अनुदान वाटप करण्यात आले. याचा पर्दाफाश ‘ लोकमत ’ ने सलग तीन दिवस करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शनिवारी आढावा बैठक घेत वंचित शेतकर्यांची यादी सादर करण्याच्या सूचना तहसीलदार गजानन गुरव यांनी केल्या आहेत. मात्र शेतकरी अनुदान मिळण्यासाठी आक्रोश करीत तहसील कार्यालयात गर्दी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. (प्रतिनिधी)