रक्तासाठी रुग्ण नातेवाईकांची खासगी रक्तपेढ्यांकडे धाव, डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात रुग्णांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:29 IST2026-03-02T11:27:59+5:302026-03-02T11:29:47+5:30
मुंबई महापालिकेच्या सांताक्रूझ येथील डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात तसेच अपघात विभागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात.

रक्तासाठी रुग्ण नातेवाईकांची खासगी रक्तपेढ्यांकडे धाव, डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात रुग्णांचे हाल
मुंबई :
मुंबई महापालिकेच्या सांताक्रूझ येथील डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात तसेच अपघात विभागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. त्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताचा नियमित साठा आवश्यक असतो. सद्य:स्थिती येथील रक्तपेढी कार्यरत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरील खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.
प्रसूतीदरम्यान महिलांना तातडीने रक्ताची गरज भासल्यास मोठी समस्या निर्माण होत आहे. ज्या रुग्णाचे नातेवाईकच नाहीत अशांना रक्त उपलब्धतेसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जून २०२५ मध्ये रुग्णालयातील रक्तपेढी नूतनीकरणाच्या कामासाठी बंद केली होती, सात महिन्यांनंतर नूतनीकरणाचे काम जानेवारीमध्ये पूर्ण झाले. काम पूर्ण होऊनही रक्तपेढीचे उद्घाटन झालेले नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
उद्घाटनाला विलंब का?
१) नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाला होत असलेल्या विलंबाचे कारण स्पष्ट नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ही रक्तपेढी जानेवारी १९९३ रोजी सुरू करण्यात आली होती. या केंद्रातून दरवर्षी सुमारे दोन हजारपेक्षा जास्त रक्तपिशव्यांचे संकलन केले जात होते. केईएम, नायर, शिव यांसारख्या मोठ्या रुग्णालयांना तसेच वांद्रे आणि सांताक्रूझ परिसरातील महापालिकेच्या प्रसूतीगृहांना या रक्तपेढीवर अवलंबून राहावे लागत होते.
२) माफक दरात येथे रक्त उपलब्ध होत असल्याने अनेक रुग्णांना दिलासा मिळत होता. म्हणूनच प्रशासनाने तातडीने रक्तपेढी सुरू करून रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.