बंडखोरांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:18 AM2019-10-13T05:18:35+5:302019-10-13T05:19:01+5:30

लढतीत रंगत वाढली । बड्या उमेदवारांनी मांडले मतदारसंघात ठाण, भाजपच्या साथीने शिवसेना उमेदवारांची अमराठी मतांची जुळवाजुळव

rebel will incresed Congress-NCP hopes | बंडखोरांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत

बंडखोरांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत

googlenewsNext

- गौरीशंकर घाळे
विनोद तावडे यांची उमेदवारी नाकारणे आणि तीन ठिकाणची बंडखोरी यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील नीरस लढतींमध्ये रंगत आणली.


उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघात एकूण १८ विधानसभेच्या जागा आहेत. त्यावर भाजप-शिवसेनेचा वरचष्मा आहे. २०१४ साली यापैकी अवघ्या दोन जागा काँग्रेसला राखता आल्या. राष्ट्रवादीला तर खातेसुद्धा उघडता आले नाही. यंदाही अशीच काहीशी स्थिती असेल असे वाटत असतानाच युतीत तीन ठिकाणी बंडखोरी झाल्याने आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. बंडखोरांमुळे चर्चेत आलेल्या तीन जागा वगळता अन्यत्र आघाडी विरुद्ध युती अशीच लढत आहे. बोरीवलीत तावडे यांच्या जागी भाजपने सुनील राणे यांना उमेदवारी दिली आहे. राणे बाहेरचे असले तरी पक्षसंघटनेच्या जोरावरच येथील उमेदवार निवडून येतो. चारकोप येथे योगेश सागर, कांदिवली पूर्वेत अतुल भातखळकर, अंधेरी पश्चिमेत अमित साटम, विलेपार्ले येथे पराग अळवणी या बड्या उमेदवारांनी दगाफटका होणार नाही, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दहिसरमध्ये मनिषा चौधरी यांना भाजपसोबत शिवसैनिकांनाही सोबत घ्यावे लागणार आहे. वांद्रे पश्चिमेत दमदार विरोधकाच्या अभावी भाजप नेते आशिष शेलार यांचा मार्ग सुकर झाला आहे. शिवसेना आमदारांकडून परंपरागत मतांसोबत उत्तर भारतीय, गुजराती-मारवाडी मतांच्या बेगमीसाठी भाजप नेते, पदाधिकारी सोबत असतील, याची खबरदारी घेतली जात आहे. यासाठी मागाठाणेत प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्वेत रवींद्र वायकर, दिंडोशीत सुनील प्रभू या दिग्गज शिवसेना उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सारी शक्ती पणाला लावली आहे.


पश्चिम उपनगरात सध्या काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्यापैकी चांदिवलीत नसीम खान यांची लढत शिवसेनेच्या दिलीप लांडे यांच्यासोबत आहे. तर, मालाड येथे असलम शेख यांनाच उमेदवारी देण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. शेख हे भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याने तिकीट देणार नसल्याचा बाता काँग्रेस नेतृत्वाने केल्या होत्या. मात्र, दुसरा उमेदवारच नसल्याने शेवटी असलम शेख यांनाच उमेदवारी द्यावी लागली. राष्ट्रवादीसह, मनसे आणि वंचितला पश्चिम उपनगरात आपला प्रभाव दाखविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. परिणामी येथील लढत रंगतदार होईल.


रंगतदार लढती

वांद्रे पूर्वेत शिवसेना आमदार तृप्ती सावंत यांच्या बंडाने काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांच्या आशा उंचावल्या आहेत. ‘मातोश्री’तील शक्ती केंद्राभोवती वावरणाऱ्या ताकदवान नेत्यांचीच या बंडाला फूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महापौर महाडेश्वर यांचा प्रवास बिकट झाला आहे.
ाजुल पटेल यांच्या बंडाने भाजप आमदार भारती लव्हेकर अडचणीत आल्या आहेत. स्थानिक शिवसेना पटेलांसोबत आहे. वर्सोवा काँग्रेससाठी पूरक मानला जातो. पटेल-लव्हेकर वादात काँग्रेस उमेदवार बलदेव सिंग खोसा बाजी मारतील का, अशी चर्चा सुरू आहे.
भाजपच्या मुरजी पटेल यांच्या बंडखोरीने अंधेरी पूर्वेतील शिवसेना उमेदवार रमेश लटके यांचा प्रवास बिकट झाला आहे.

Web Title: rebel will incresed Congress-NCP hopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.