नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 00:50 IST2021-03-08T00:50:02+5:302021-03-08T00:50:33+5:30
पर्यावरणाचा ऱ्हास, कोकणातील जमिनी आणि प्रकल्प परिसरातील मंदिरांच्या भवितव्याबाबत असलेल्या शंका यामुळे नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला.

नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी, राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचे दीर्घकालीन हित लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केले.
पर्यावरणाचा ऱ्हास, कोकणातील जमिनी आणि प्रकल्प परिसरातील मंदिरांच्या भवितव्याबाबत असलेल्या शंका यामुळे नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. भाजप वगळता शिवसेनेसह सर्वच पक्षांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असणारा हा तेलशुद्धीकरण प्रकल्प सध्या वादात अडकला आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून प्रकल्पासाठी जनमत तयार करण्याचे आवाहन केले. कोरोनामुळे सर्वच संदर्भ बदलले आहेत. लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. कोकणातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुण्याची वाट धरावी लागते.
शिष्टमंडळ ‘कृष्णकुंज’वर
स्थानिकांचे शिष्टमंडळ सोमवारी राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेणार आहे. प्रकल्पग्रस्तांचा विरोध मावळत असून, स्थानिक प्रकल्पाच्या बाजूने असल्याची चर्चा आहे. अलीकडेच शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाच्या बाजूने भूमिका घेतली होती. मात्र, नंतर त्यांनी घूमजाव केले.