‘तापमानवाढीमुळे पावसाळा अनियमित’ - गिरीश राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:20 IST2019-06-23T07:19:47+5:302019-06-23T07:20:02+5:30

पृथ्वीच्या तापमानात झालेली वेगवान वाढ व त्यामुळे मोडलेली महासागर व वातावरणाच्या अभिसरण पद्धतीमुळे पावसाळा अनियमित झाला आहे.

'Rainy irregularity due to temperature rise' - Girish Raut | ‘तापमानवाढीमुळे पावसाळा अनियमित’ - गिरीश राऊत

‘तापमानवाढीमुळे पावसाळा अनियमित’ - गिरीश राऊत

मुंबई : पृथ्वीच्या तापमानात झालेली वेगवान वाढ व त्यामुळे मोडलेली महासागर व वातावरणाच्या अभिसरण पद्धतीमुळे पावसाळा अनियमित झाला आहे. त्यामुळेच यंदा मान्सून नेहमीपेक्षा विलंबाने दाखल झाला असून, अद्यापही म्हणावा तसा पावसाळा सुरू झालेला नाही. यामागची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी पृथ्वीरक्षण चळवळ निमंत्रक गिरीश राऊत यांच्याशी केलेली चर्चा...

प्रश्न : मान्सून अनियमित होण्यास कोणते घटक जबाबदार आहेत?
उत्तर : हवामान खाते एल निनो हा सागरी प्रवाह आणि ‘वायू’ वादळाला जबाबदार धरत आहे. हा प्रवाह दर सहा किंवा अकरा वर्षांनी शतकानुशतके उसळत होता. वादळेही होतच होती, पण पावसाळा वेळापत्रक पाळत होता. आता हे अविष्कार अनियमित पद्धतीने भयंकर विध्वंसक बनले. याचे कारण पृथ्वीच्या तापमानात झालेली वेगवान वाढ व त्यामुळे मोडलेली महासागर व वातावरणाची अभिसरण पद्धती आहे.

प्रश्न : हवामानास कशाचा फटका बसतो?
उत्तर : सूर्याची उष्णता शोषून धरणाऱ्या कार्बन डाय आॅक्साइड, मिथेन, नायट्रोजन आॅक्साइड्स, पाण्याची वाफ, क्लोरोफ्लुरोकार्बन्सची करोडो वर्षांच्या वातावरणात अचानक फक्त सुमारे २५० वर्षांत झालेली बेसुमार वाढ यास कारणीभूत आहे. ही वाढ म्हणजे वातावरणातील बदल, स्वयंचलित यंत्राच्या आगमनामुळे त्यांना चालविण्यासाठी जाळलेल्या कोळसा, तेल वायूमुळे व सीमेंटसारख्या रासायनिक पदार्थांच्या, विजेच्या व इतर वस्तूंच्या निर्मितीमुळे झाली आहे. याचवेळी सुमारे २५० ते ३०० कोटी वर्षे वातावरणातील कार्बन शोषून तो कमी करत, प्राणवायू वाढविणाºया हरितद्रव्याचा, स्वयंचलित यंत्र व वस्तुनिर्मितीमुळे नाश होत गेला.

तोच खरा शाश्वत विकास
लाखो पिढ्या यापूर्वी जंगलात जगल्या. कृषियुगात भूमी सुपीक होती. भूजल पातळी भूपृष्ठालगत होती. विहिरी तळी पाण्याने भरली होती. त्यांनी नद्यांना अडविणारी जंगले बुडविणारी धरणे बांधली नाहीत.
डोंगर, जंगल शाबूत होते. म्हणून गारवा होता आणि नद्या भरून वाहत होत्या. सन १८३० पर्यंत जगाच्या उत्पादन व व्यापारात ७३ टक्के वाटा यंत्र न वापरणाºया भारत व चीनचा होता. तो खरा शाश्वत विकास होता. कारण डोंगर, भूमी, जंगलांत, नदी व सागरात मानवी हस्तक्षेप नव्हता.

Web Title: 'Rainy irregularity due to temperature rise' - Girish Raut

टॅग्स :Mumbaiमुंबई