Rain Update: हवामान विभागाने मुंबईकरांसाठी महत्वाची अपडेट दिली आहे. गेल्या काही दिवसापासून उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी दिलासा मिळणार आहे. पुढील २४ तासांत मुंबईसह उपनगरातील तुरळक ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यतेचा अंदाजहवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसापासून राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. आज पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य राजस्थानपासून उत्तर झारखंडपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. जो वायव्य आणि पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड सारख्या भागातून जात आहे. त्यामुळे पावसाळी आणि वादळी हवामानाची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
वेळेआधीच मान्सून धडकणार
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार,यावेळी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर वेळेच्या पाच दिवस आधी धडकू शकतो. यावेळी २७ मे रोजी देशभरात मान्सूनच्या आगमनाची अपेक्षा आहे. साधारणपणे, दरवर्षी १ जून रोजी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर पोहोचतो. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, जर अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे त्याच वेळेत मान्सून केरळमध्ये दाखल झाला, तर २००९ नंतर भारतीय भूमीवर मान्सूनचे हे सर्वात लवकर झालेले आगमन असणार आहे. या आधी २००९मध्ये मान्सून २३ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता.
साधारणपणे, नैऋत्य मान्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशभरात दाखल होतो. १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घेण्यास सुरुवात करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत परतून जातो. आयएमडीने एप्रिलमध्ये २०२५च्या मान्सूनसाठी सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि भारतीय उपखंडात सामान्यपेक्षा कमी पावसाच्या परिस्थितीची शक्यता नाकारली होती.