रेल्वेची २४,९०३ फेरीवाल्यांवर कारवाई; दीड कोटी वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 08:06 IST2025-04-01T08:06:15+5:302025-04-01T08:06:42+5:30
Mumbai News: पश्चिम रेल्वेने गेल्या दोन वर्षांत २४ हजार ९०३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४७ लाख ७९ हजार २४० रुपये दंड वसूल केला आहे. रेल्वे परिसरात किंवा डब्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते.

रेल्वेची २४,९०३ फेरीवाल्यांवर कारवाई; दीड कोटी वसूल
- महेश काेले
मुंबई - पश्चिम रेल्वेने गेल्या दोन वर्षांत २४ हजार ९०३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ४७ लाख ७९ हजार २४० रुपये दंड वसूल केला आहे.
रेल्वे परिसरात किंवा डब्यांमध्ये फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा फेरीवाल्यांवर रेल्वे अधिनियमानुसार कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रेल्वे कायदा काय?
रेल्वे अधिनियम १९८९चे कलम १४७ हे अतिक्रमण आणि अतिक्रमणासंदर्भात आहे. रेल्वेच्या जागेत बेकायदा प्रवेश करणे किंवा रेल्वेच्या जागेचा गैरवापर करणे किंवा तेथून जाण्यास नकार देणे या गुन्ह्यांसाठी सहा महिन्यांपर्यंतची शिक्षा किंवा १,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो किंवा दोन्हीही होऊ शकतात.
मध्य रेल्वेचा बडगा
गेल्या वर्षभरात रेल्वे गाडी व रेल्वे परिसरात आरपीएफने ३७,९२० फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यात ३७ हजार ८२३ बेकायदा फेरीवाल्यांना अटक करून त्यांच्याकडून ४ कोटी २३ लाख ९४ हजार ७१ रुपये दंड वसूल करण्यात आला.
तीन महिन्यात ३,७५० जण कचाट्यात
२०२४मध्ये पश्चिम रेल्वे परिसरात किंवा डब्यांमध्ये वस्तू किंवा खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या २१,१५३ फेरीवाल्यांवर कारवाई करून १,२९,६४,४२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर चालू वर्षात ३,७५० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा करत त्यांच्याकडून १८,२७,८२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.