मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकल, कल्याण-बदलापूर चौथ्या मार्गाला मंजुरी; रेल्वे मंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:52 IST2025-04-11T13:51:25+5:302025-04-11T13:52:54+5:30
Railway Minister Ashwini Vaishnav: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना ...

मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकल, कल्याण-बदलापूर चौथ्या मार्गाला मंजुरी; रेल्वे मंत्र्यांच्या मोठ्या घोषणा
Railway Minister Ashwini Vaishnav: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी विविध प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गोंदिया-बल्लारशाह या नव्या रेल्वे मार्गांची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबईत १ ते ४ मे दरम्यान वेव्हज या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. जागतिक दृकश्राव्य, मनोरंजन क्षेत्राची शिखर परिषद मुंबईतील बीकेसी येथे होणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना गोंदिया बल्लारशाह लिंकच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. तसेच मुंबईसाठी नव्या एसी लोकलचे काम सुरु असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदिया ते बल्लारशहा २४० किलोमीटर दुहेरी रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी ४८९० कोटींचा निधी दिला जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे उत्तरेकडून दक्षिणेसाठी एक नवा मार्ग तयार झाला आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे," असे अश्विनी वैष्णव म्हणाले. जळगाव-जालना या नव्या रेल्वे मार्गांची घोषणा रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात आली.
"महाराष्ट्रात रेल्वेची गुंतवणूक १ लाख ७३ हजार ८०४ कोटींएवढी झाली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३ हजार ७७८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यूपीएचे सरकार असताना महाराष्ट्रासाठी केवळ ११७१ कोटी रुपयांचे रेल्वे बजेट मिळत होते," असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
मुंबईसाठी २३८ नव्या एसी लोकलचे काम सुरू करण्यात आल्याचेही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. तसेच कल्याण ते बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण-आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.