लोहमार्गाची स्वच्छता करणाऱ्या गाड्या नव्या रूपात; रुळांवरील कचराही साफ होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 09:59 IST2023-07-12T09:59:20+5:302023-07-12T09:59:39+5:30
वार्षिक दोन कोटींची बचत, पूर्वी गाड्यांचे सर्व डबे कव्हर्ड स्थितीत असायचे, त्यामुळे एकूण भार वाहून नेण्याची क्षमता कमी होते.

लोहमार्गाची स्वच्छता करणाऱ्या गाड्या नव्या रूपात; रुळांवरील कचराही साफ होणार
मुंबई : मध्य रेल्वेने रुळांची स्वच्छता वाढविण्यासाठी आणि रेल्वे मार्गावरील कार्यक्षमता सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. रेल्वे रुळावर साचलेला चिखल, घाण आणि कचरा साफ करण्यासाठी गाड्यांच्या रचनेत बदल केला आहे. त्यामुळे रेल्वे रुळावरील कचरा, चिखल वाहतूक सोपे होईल आणि ६० टन अतिरिक्त लोडिंग क्षमता आणि वार्षिक दोन कोटीची बचत होणार आहे.
पूर्वी गाड्यांचे सर्व डबे कव्हर्ड स्थितीत असायचे, त्यामुळे एकूण भार वाहून नेण्याची क्षमता कमी होते. मध्य रेल्वेने ३ डबे फ्लॅट वॅगन्समध्ये बदलून ६ डब्यांच्या गाड्यांचे यशस्वीपणे रूपांतर केले. (पॉवरिंग कोचचे २ मोटर कोच आणि एक कोच वगळता) या बदलामध्ये डब्यांचे छत काढून टाकणे आणि भार क्षमता वाढवण्यासाठी त्यांची मजबुती वाढणार आहे. असे आणखी दोन ६ डब्यांच्या गाड्यामध्ये येत्या काळात फेरबदल केला जाणार आहे.
या बदलामुळे भार वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे. मोटर डबा वगळता ३ डबे सपाट डब्यामध्ये रूपांतरित करून आणि त्यांची भारक्षमता लक्षणीय वाढली आहे. पूर्वी भार क्षमता प्रतिडबा ४० टन आणि प्रतिगाडी २४० टन होती, आता भार क्षमता ६० टन प्रति सुधारित डबा आणि ३०० टन प्रतिगाडी झाली जी ६० टनने वाढली आहे. या सुधारणांमुळे कचऱ्याची अधिक कार्यक्षम वाहतूक करता येते. कार्यक्षम मक लोडिंग/अनलोडिंग: इएमयु मग स्पेशल गाडी, फ्लॅट वॅगन्समध्ये रूपांतरित केल्यामुळे, मक लोडिंग आणि अनलोडिंग क्रियांसाठी जेसीबी आणि अर्थ-मूव्हर्ससारख्या अवजड यंत्रसामग्रीचा वापर सुलभ होते. यामुळे मनुष्यबळ कमी लागत असून रेल्वेच्या अतिरिक्त खर्चात बचत होते.
स्पेशल ईएमयू गाडीमध्ये उल्लेखनीय बदल
सुधारित ईएमयू गाडीमुळे जड कचरा वाहतूक करताना दोन्ही बाजूंना लोकोमोटिव्हची गरज नाही. यामुळे मध्य रेल्वेच्या खर्चात मोठी बचत झाली असून अंदाजे दरवर्षी २ कोटी वाचणार आहेत. स्पेशल ईएमयू गाडीमध्ये हे उल्लेखनीय बदल मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय अध्यक्ष रजनीश कुमार गोयल, वरिष्ठ रेल्वे अधिकारी विवेक आचार्य आणि रामेंद्र कुमार राय यांच्या पुढाकाराने शक्य झाले. ईएमयू गाड्या पूर्वी केवळ प्रवाशांच्या प्रवासासाठी वापर केला जात होता, त्या आता स्वच्छ ट्रॅक राखण्यास हातभार लावू शकत आहेत.