भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार - राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 08:17 PM2017-08-31T20:17:38+5:302017-08-31T20:23:39+5:30
मुंबई शहराच्या भेंडी बाजार परिसरात इमारत कोसळून सुमारे 21 जणांना प्राण गमवावे लागण्याच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई महानगर पालिका जबाबदार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
![Radhakrishna Vikhe Patil responsible for the state government and Mumbai Municipal Corporation for the incident of Bhendi Bazar | भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार - राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil responsible for the state government and Mumbai Municipal Corporation for the incident of Bhendi Bazar | भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार - राधाकृष्ण विखे पाटील](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/radhakrishna%20vikhe%20patil_201707304.jpg)
भेंडी बाजारच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई मनपा जबाबदार - राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 31 - मुंबई शहराच्या भेंडी बाजार परिसरात इमारत कोसळून सुमारे 21 जणांना प्राण गमवावे लागण्याच्या घटनेसाठी राज्य सरकार व मुंबई महानगर पालिका जबाबदार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
भेंडी बाजार भागातील इमारत कोसळून बळी गेलेल्या निरपराध नागरिकांप्रती विखे पाटील यांनी संवेदना व्यक्त केल्या. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, ही घटना जेवढी दुर्दैवी आहे, तेवढीच संतापजनक देखील आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिकेचे प्रशासनावर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखीत झाले आहे. शिवसेनेने या घटनेची जबाबदारी म्हाडावर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अशा अनेक घटनांसाठी महानगर पालिका देखील कारणीभूत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. घाटकोपरमध्ये घडलेल्या घटनेच्या वृत्ताची शाई अजून वाळलेली नाही. मुंबई मनपातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांविरूद्ध राज्य सरकार कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
मुंबईतील भेंडी बाजार येथील जे जे मार्ग परिसरात असलेली सहा मजली इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसंच स्थानिक लोकांकडूनही बचावकार्य केले जात आहे. एनडीआरएफचे 45 जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
सचिन अहिर यांची टीका
मुंबईतील जे जे मार्ग परिसरात हुसेनी इमारत दुर्घटनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी सांगितले की, यापुढे कोणतीही दया न दाखवता धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना जबरदस्तीने इमारतीबाहेर काढून त्या रिकाम्या करण्यास भाग पाडू. तसंच मुख्यमंत्र्यांचे आदेश घेऊन येत्या 8 दिवसांत ही कठोर कारवाई करणार असल्याचेही मेहता यावेळी म्हणाले होते. यावर, गृहनिर्माण मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी प्रकाश मेहता यांना टार्गेट केले आहे.