लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासूर रोखायलाच हवा. या प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रदूषण कमी करणे, तसेच वन्यजीव आणि वनस्पतींचे संरक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी केले.
प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मंदिर परिसरातील स्टॉलधारकांना त्यांनी कापडी पिशव्यांचे वाटप करून पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्याचे आवाहन केले. धार्मिक स्थळाच्या परिसरात पर्यावरणपूरक सवयी रुजविण्याबरोबर पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित भविष्य घडविण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मंत्री मुंडे यावेळी म्हणाल्या.
सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यासाठी संकल्प, संयम आणि प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. शासनस्तरावर पर्यावरणीय समस्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी धोरणे व नियम लागू केले आहेत. सिंगल युज प्लास्टिकवर निर्बंध घालण्याबरोबरच जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी जागरूकता मोहिमादेखील राबविल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.